आमच्या चित्रपटावर अन्याय होतोय; सूरजने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली खंत

| Updated on: Oct 23, 2024 | 12:16 PM

सूरज चव्हाणचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यावर सूरजने सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करून चित्रपटावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली आहे.

आमच्या चित्रपटावर अन्याय होतोय; सूरजने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली खंत
Follow us on

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणचा ‘राजाराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाणची भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता या चित्रपटावर अन्याय होतोय, अशी खंत बाळगत एक व्हिडीओ सूरजच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतोय की, “नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आमच्या ‘राजा राणी’ चित्रपटावर अन्याय होतोय. त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. थिएटरमध्ये जा, पिक्चर बघा आणि सपोर्ट करा”, असे म्हणत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन त्याने केले आहे.

चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांजवळ साकडे

सूरजनंतर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या रोहन पाटीलने देखील या व्हिडीओद्वारे प्रेक्षकांसोबत संवाद साधला आहे. तो म्हणतो की, “आता सूरजने म्हटल्याप्रमाणे ‘राजा राणी’ हा सिनेमा १८ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. मी स्वत: त्यामध्ये भूमिका साकारली आहे. सूरज मोठ्या भूमिकेत आहे. बिग बॉसनंतर सूरज पहिल्यांदाच ‘राजाराणी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसत आहे. खूप चांगला सिनेमा बनला आहे.”

Raja Rani Movie

पुढे ते म्हणाले की, “पूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही लोकांकडून असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा बंद करण्यात यावा, बॅन करावा. गरीब पोरं जर मोठी होत असतील किंवा संघर्षाला यश मिळत असेल तर काही लोकांना खपत नाही, असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की, काही लोकं जरी म्हणत असली की हा सिनेमा बंद करा, तरी हा सिनेमा मोठ्या ताकदीनं सुरू राहील. आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे की ते या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील, प्रेम करतील. जसा सूरजला बिग बॉसमध्ये पाठिंबा दिला, तसाच या चित्रपटालासुद्धा पाठिंबा देतील.”

सूरजच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी?

‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरजची भूमिका असलेला ‘राजा राणी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे हा चित्रपट प्रदर्शित झालाही. मात्र आता या चित्रपटावर संकट आलेलं पाहायला मिळत आहे. ‘राजा राणी’ चित्रपटातून समाजाला चूकीचा संदेश दिला जात असून तो घातक आहे. सूरज चव्हाण प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे चित्रपटातील अनुकरण अनेकजण करू शकतात.

Raja Rani Movie

चित्रपटाच्या शेवटी नातेवाईक आणि समाजामुळे प्रेम करणारे जोडपे एकत्र येऊ शकत नाही म्हणून ते एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. हा चित्रपटातून जाणारा संदेश चूकीचा असल्याचं म्हटलं जात आहे म्हणून चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी. अन्यथा कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असे अ‍ॅड. वाजिद खान (बिडकर) यांनी म्हटल्याचं सांगितलं जातं आहे.

चित्रपटावर अन्याय झाल्याची सूरची भावना 

चित्रपटाबद्दल आलेल्या या प्रतिक्रियांमुळे चित्रपट अडचणीत आल्याची खंत सूरज आणि या चित्रपटातील इतर कलाकरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या चित्रपटावर अन्याय न करता महाराष्ट्राने पाठिंबा द्यावा आणि हा चित्रपट पाहायाला सिनेमागृहांमध्ये यावं अशी विनंती सूरज आणि इतर कलाकारांनी केली आहे.

दरम्यान, सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. आपल्या हटके स्टाईलमुळे सूरजने बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मन जिंकली. याच प्रेमामुळे तो विजेताही ठरला. सूरजला संपू्र्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.