‘त्याच्या जाण्याची माहिती कोणालाही नसणे हे..’; रवींद्र महाजनी यांच्या निधनावर अभिनेत्रीकडून दु:ख व्यक्त

| Updated on: Jul 16, 2023 | 5:07 PM

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली.

त्याच्या जाण्याची माहिती कोणालाही नसणे हे..; रवींद्र महाजनी यांच्या निधनावर अभिनेत्रीकडून दु:ख व्यक्त
Ravindra Mahajani
Follow us on

पुणे | 16 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी हे तळेगाव इथळ्या आंबीमध्ये एका सदनिकेत मृतावस्थेत आढळले. ते 77 वर्षांचे होते. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते या सदनिकेत एकटेच राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीमधील नागरिकांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूप्रकरणी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून शोक व्यक्त करण्यात आला.

‘त्याचं निधन झालं याचं दु:ख मोठं आहे, पण त्याच्या जाण्याची माहिती कोणालाही नसणं हे वेदनादायक आहे. एक उत्तम अभिनेता मराठी चित्रपटसृष्टीने गमावला आहे’, अशा शब्दांत अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचा एकाकी अवस्थेत मृत्यू झाला होता. ही घटना जवळपास 25 वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर आता रवींद्र महाजनींनी एकाकी अवस्थेत या जगाचा अखेरचा निरोप घेतला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उतारवयात एकाकी पडल्याचं चित्र याआधीही पहायला मिळालं.

महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. महाजनी यांचं कुटुंब, त्यांचा मुलगा गश्मीरची लोकप्रियता, आर्थिक स्थैर्य असं सर्व असूनही ते एका भाड्याच्या घरात एकाकी का राहत होते, इतरांशी फारसा संवाद का साधत नव्हते असे प्रश्न यावेळी उपस्थित झाले. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे या दिवसांत त्यांच्याशी कोणीच संपर्क केला नाही का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच ते नाटकात-चित्रपटात शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी चांगलेच प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या, ज्या चांगल्याच गाजल्याही.

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.