पत्नीसह प्रसिद्ध अभिनेत्याला 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा; ‘चिरंजीवी ब्लड बँक’वर केले होते गंभीर आरोप

| Updated on: Jul 19, 2023 | 2:02 PM

सीनिअर नरेश यांच्यामुळे आपण प्रोजेक्ट्स गमावले आणि आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप राजशेखर यांनी केला होता. त्यावेळी चिरंजीवी यांनी त्यांच्या या वागणुकीचा निषेध व्यक्त केला होता. त्याचसोबत राजशेखर यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली होती.

पत्नीसह प्रसिद्ध अभिनेत्याला 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा; चिरंजीवी ब्लड बँकवर केले होते गंभीर आरोप
Rajasekhar, Jeevitha
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद | 19 जुलै 2023 : तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजशेखर आणि त्यांची पत्नी जीविता यांना नामपल्ली कोर्टाने एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2011 मध्ये त्यांनी ‘चिरंजीवी ब्लड बँक’वर बरेच गंभीर आरोप केले होते. या ब्लड बँकद्वारे रक्त काळ्या बाजारात विकलं जातंय आणि व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप दोघांनी केला होता. त्याविरोधात मेगास्टार चिरंजीवी यांचा मेहुणा अल्लू अरविंदने राजशेखर आणि जीविता यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अखेर त्या खटल्याचा निकाल लागला आहे.

तुरुंगवासाची शिक्षा

मंगळवारी 18 जुलै नामपल्ली मुख्य दंडाधिकाऱ्यांनी राजशेखर आणि जीविता यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याचसोबत पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. याप्रकरणी दोघांना जामीन मिळाला असून आता ते उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. तेलुगू चित्रपटसृष्टीतील हे तिघेही नामवंत कलाकार आहेत. राजशेखर-जीविता आणि चिरंजीवी यांच्यात खूप आधीपासून वाद सुरू आहेत.

चिरंजीवी आणि राजशेखर यांच्यातील वाद

2020 मध्ये राजशेखर आणि चिरंजीवी यांनी मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन (MAA) कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चिरंजीवी यांनी मंचावर आपलं भाषण संपवलं. तितक्यात राजशेखर यांनी मंचावर जाऊन त्यावेळचे एमएएचे अध्यक्ष सीनिअर नरेश यांच्याविरोधात वक्तव्य करून कार्यक्रमात व्यत्यत आणला होता.

हे सुद्धा वाचा

भर कार्यक्रमात केला होता तमाशा

सीनिअर नरेश यांच्यामुळे आपण प्रोजेक्ट्स गमावले आणि आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप राजशेखर यांनी केला होता. त्यावेळी चिरंजीवी यांनी त्यांच्या या वागणुकीचा निषेध व्यक्त केला होता. त्याचसोबत राजशेखर यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली होती. चिरंजीवी आणि राजशेखर यांच्यात झालेल्या अनेक वादांपैकी ही एक घटना होती. मात्र 2003 पासूनच या दोघांमध्ये वाद सुरू होता.