प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी

| Updated on: May 13, 2024 | 7:51 AM

Pavitra Jayaram road accident | झगमगत्या विश्वात शोककळा... प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं भयानक कार अपघातात निधन, अभिनेत्रीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर... अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं दुःख

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी
Follow us on

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघातात निधन झालं आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या बहिणीसोबत अन्य तीन जण देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. झालेल्या धक्कादायक घटनेमुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्रीने अपघातात शेवटचा श्वास घेतला त्या अभिनेत्रीचं नाव पवित्रा जयराम आहे. पवित्रा जयराम दाक्षिणात्य टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं रविवारी, 12 मे रोजी आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथे निधन झालं. अपघातात पवित्रा जागीच ठार झाली, तर तिची बहीण, ड्रायव्हर आणि अभिनेता गंभीर जखमी आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात?

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना हा भयानक अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारचे नियंत्रण सुटले आणि कार मेहबूब नगरमध्ये डिव्हायडरला धडकली. त्यानंतर हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकली. या अपघातात पवित्र हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पवित्राचा चुलत बहीण अपेक्षा, चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

पवित्रा जयराम हिच्या निधनानंतर सिनेविश्वात खळबळ माजली आहे. अनेक सेलिब्रीटी आणि चाहते अभिनेत्रीला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेते समीप आचार्य यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेते म्हणले, “तू नाहीस…. सकाळी कानावर आली.. विश्वास बसत नाही. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, तू नेहमीच खास राहशील.”

पवित्रा जयकर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘तिलोत्तमा’ (Thilottama) मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.