Vivek Oberoi: ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताच विवेक ओबेरॉय म्हणाला, “ते सर्व संपलंय पण..”

| Updated on: Dec 15, 2022 | 10:09 AM

ऐश्वर्यासोबतच्या अफेअरबद्दल विवेक ओबेरॉयला पुन्हा विचारला गेला प्रश्न; वाचा काय म्हणाला तो?

Vivek Oberoi: ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताच विवेक ओबेरॉय म्हणाला, ते सर्व संपलंय पण..
ऐश्वर्या राय बच्चन, विवेक ओबेरॉय
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं अफेअर जगजाहीर होतं. या दोघांचं अफेअर जितकं चर्चेत होतं, त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. विविध मुलाखतींमध्ये विवेक याविषयी अनेकदा व्यक्त झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा त्याला पुन्हा एकदा ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यावर उत्तर देण्यास त्याने नकार दिला. तो सर्व भूतकाळ आहे, असं म्हणत त्याने प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र त्याने तरुणांसाठी मोलाचा सल्ला दिला.

बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरुवातीला ऐश्वर्यासोबतचं नातं उघड करणं चुकीचं ठरलं का, असा प्रश्न विवेकला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, कारण ते सर्व संपलंय आणि धुळीत मिळालंय. पण जे प्रतिभावान तरुण ही मुलाखत पाहत असतील, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यात तुमच्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करा.”

हे सुद्धा वाचा

“कामात तुमचं 100 टक्के योगदान द्या. जर ते तुमच्या प्रोफेशनलिझ्मवर हल्ला करू शकत नाहीत, तुमच्या प्रतिभेवर हल्ला करू शकत नाहीत, तुमच्या कामावर हल्ला करू शकत नाहीत तर इतर कोणत्याही मुद्द्यावरून तुमच्यावर हल्ला करण्याची संधी त्यांना देऊ नका. करिअरप्रती तुमची जी कमिटमेंट आहे, त्यावरच लक्ष केंद्रीत करा”, असा सल्ला त्याने तरुणाईला दिला.

या मुलाखतीत पुन्हा एकदा त्याला ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लग्न होईपर्यंत तू कधीच तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल का व्यक्त झाला नाहीस, असं त्याला विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना विवेक म्हणाला, “मला वाटतं जर लोकांनी तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही संवेदनशील असाल, जे बहुतांश लोक असतात.. तर तुम्ही तुमचं खासगी आयुष्य इतरांसमोर उघड करू नये.”

विवेक आणि ऐश्वर्या यांचं 2003 मध्ये ब्रेकअप झालं. ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात सलमान खान याने धमकी दिल्याचा खुलासा त्याने नंतर केला होता. इतकंच नव्हे तर सलमानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप विवेकने केला होता.

ऑक्टोबर 2010 मध्ये विवेकने प्रियांका अलवा हिच्याशी लग्न केलं. कर्नाटकचे मंत्री जीवाराज अलवा यांची ती कन्या आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. तर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं.