बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमक्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अंडरवर्ल्ड विरोधात आवाज उचल्याची हिंमत कशी मिळाली यावर देखील अभिनेत्याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत विवेकला विचारण्यात आलं की, ‘जेव्हा तुझा वाईट काळ आला तेव्हा नक्की काय झालं होतं? दिग्दर्शक कॉल करत नव्हते की मिळालेले सिनेमे हातातून जात होते?’ यावर विवेक म्हणाला, ‘अनेक गोष्टी घडल्या आहेत. लोकांवर बाहेरून दबाव असायचा की मला सिनेमांमध्ये कास्ट करु नका… बॉलिवूडमध्ये तेव्हा लॉबी प्रकार खूप चालत होता. दिग्दर्शकांवर दबाव असायचा… सतत धमक्या यायच्या… मला देखील अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत.’
पुढे विवेक याला ‘आजही बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला असं वाटतं आजच्या मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. पूर्वी अनेक प्रश्न विचारले जायचे. कोणासोबत काम केलं, कसं काम केलं, का काम केलं… पण आता असं होत नाही. पूर्वी धमक्या यायच्या. मला अनेकदा थेट जीवेमारण्याच्या धमक्या आल्या होत्या.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
अंडरवर्ल्ड विरोधात उभं राहण्याचा निर्णय कधी घेतला? असा प्रश्न देखील विवेक याला विचारण्यात आला. ‘मी माझ्या आईला रडताना पाहिलं आहे. तिला पाहिल्यानंतर मला देखील रडू आवरलं नाही. तिनेच माझी समज घातली. रडत बसलास तर काहीही होणार नाही. आई मला कॅन्सरच्या रुग्णालयात घेवून गेली. तव्हा मला कळलं की दुसऱ्याच्या अडचणींसमोर आपला अचडणी फार कमी आहे…’ असं देखील विवेक म्हणाला.