अतुल परचुरे यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?

| Updated on: Oct 15, 2024 | 9:10 AM

मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयकौशल्याचं नाणं खणखणीत वाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

अतुल परचुरे यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?
Atul Parchure
Image Credit source: Instagram
Follow us on

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करून ते पुन्हा रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

निधनाचं कारण काय?

नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर अभिनेता म्हणून घोडदौड सुरू असतानाच परचुरे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. सुरुवातीला झालेले चुकीचे उपचार, त्यानंतर कर्करोगावरचे उपचार अशी कडवी झुंज देत ते आजारातून बरे झाले होते. अत्यंत जिद्दीने कर्करोगावर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं होतं. त्यांची भूमिका असलेला ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ते ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची जय्यत तयारी सुरू होती. या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटाच्या विकाराचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. याही आजारपणातून बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील अशी आशा त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मित्रपरिवाराला होती. मात्र या आजारावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

हे सुद्धा वाचा

अतुल परचुरे यांनी बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका करत व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.