सर्वकाही सोडून ओशोंच्या शरणी का गेले विनोद खन्ना? वडिलांच्या निर्णयाबद्दल मुलगा अक्षयला काय वाटतं?

| Updated on: Aug 16, 2024 | 12:05 PM

यशाच्या शिखरावर असताना अभिनेते विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडलं आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्यावेळी त्यांनी कुटुंबीयांनाही मागे सोडलं होतं. हा निर्णय का घेतला, याविषयी ते एका मुलाखतीत व्यक्त झाले होते. नंतर मुलगा अक्षय खन्नानेही त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

सर्वकाही सोडून ओशोंच्या शरणी का गेले विनोद खन्ना? वडिलांच्या निर्णयाबद्दल मुलगा अक्षयला काय वाटतं?
Vinod Khanna and Akshaye Khanna
Image Credit source: Instagram
Follow us on

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी यशाच्या शिखरावर असताना फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ते अमेरिकेला निघून गेले होते आणि तिथे त्यांनी अध्यात्मिक गुरू रजनीश यांचा आश्रय घेतला. रजनीश हे ‘ओशो’ म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या अनेक हाय प्रोफाइल अनुयायांमध्ये विनोद खन्ना यांचाही समावेश होता. ओशो यांच्या सानिध्यात आल्यानंतर विनोद खन्ना यांनी केवळ त्यांच्या फिल्मी करिअरकडेच नव्हे तर कुटुंबाकडेही पाठ फिरवली होती.

ओशोंच्या सानिध्यात का गेले?

सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत विनोद खन्ना यांनी त्यांच्या या निर्णयामागचं कारण समजावून सांगितलं होतं. करिअरमध्ये एका टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर साचलेपण आलं होतं, असं ते म्हणाले होते. ओशो यांचा अनुयायी बनण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं, “माझं स्वत:चं मन कारणीभूत होतं. माझ्या मनात खूप विचार येत होते. मी प्रचंड तापट होतो. माझ्या विचारांना कोणती दिशाच नव्हती. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी चिडायचो. कुठेतरी साचलेपण आलं होतं. लोक काहीही बोलले तरी त्यावर चिडून प्रतिक्रिया द्यायचो. प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसते. पण जेव्हा मी ध्यानसाधना करू लागलो, तेव्हा मला या गोष्टींचा फारसा फरक पडत नव्हता. तुम्हाला तुमच्याच मनाचा मास्टर होणं गरजेचं असतं. या इतर सर्व गोष्टींनी मला हे बोलायला भाग पाडलं की आता पुरे झालं. माझ्याकडे पुरेसा पैसा आहे. पण जर मला ध्यानसाधनेत स्वत:ला झोकून द्यायचं असेल तर मला पूर्ण वेळ द्यावा लागेल. मला आश्रमात राहावं लागेल. मला गुरुंच्या सानिध्यात राहावं लागेल. त्यामुळे माझ्यातच ती गरज निर्माण झाली.”

निर्णयामागे स्वार्थ होता का?

हा निर्णय घेणं स्वार्थीपणाचं वाटलं का, असा प्रश्न विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “अर्थातच. तुम्ही स्वार्थी नसाल तर असं काहीच करू शकणार नाही. कारण तुम्हाला स्वत:लाच तुमच्या अस्तित्वापलीकडचं शोधायचं असतं. मी जेव्हा हा निर्णय कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा ते नाराज झाले होते. पण प्रत्येकाला इथे एकटंच प्रवास करायचा आहे. तुम्ही एकटेच या जगात आला आहात आणि एकटेच जाणार आहात. तुम्हालाच तुमच्या मार्गावर चालायचं आहे. पण मी काही पळून गेलो नव्हतो. मी माझ्या कुटुंबीयांच्या संपर्कात होतो. मी त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी पुरवत होतो.”

हे सुद्धा वाचा

अक्षय खन्नाची प्रतिक्रिया

सिमी गरेवाल यांनीच नंतर विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्नाची मुलाखत घेतली होती. जेव्हा विनोद खन्ना हे कुटुंबीयांना सोडून ओशोंच्या सानिध्यात गेले, तेव्हा अक्षय फक्त पाच वर्षांचा होता. त्यावेळी नेमकं काय घडत होतं, हे समजत होतं का, असा प्रश्न सिमी यांनी अक्षयला विचारला होता. त्यावर तो म्हणाला, “नाही, मला वाटत नाही की त्या वयात कोणीच ती गोष्ट समजू शकलं असतं. मला कोणी समजावून सांगितल्याचं आठवत नाहीये. ते जे होतं, ते तसंच होतं. मला वाटत नाही की कोणी समजावण्याचा प्रयत्न केला असेल. मला तरी आठवत नाहीये. कदाचित कोणीतरी समजावलंही असेल. पण याक्षणी मला ते आठवत नाहीये. त्या वयात अशा गोष्टी समजण्याइतके हुशार तुम्ही नसता. गोष्टींना सामोरं जाण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते. आता खऱ्या अर्थाने मला ती गोष्ट समजतेय. मला असं वाटत नाही की हा चुकीचा निर्णय होता किंवा वाईट निर्णय होता. जेव्हा नात्यात गुंतलेल्या लोकांना त्यातून काहीच मिळत नसेल तर ते नातं पुढे नेण्यात काही अर्थ नसतं. खासकरून तेव्हा जेव्हा ते निमित्त दुसऱ्यासाठी असतं.”

स्वार्थी स्वभावाचं समर्थन

वडिलांप्रमाणेच अक्षय खन्नानेही स्वार्थी स्वभावाचं, विचारांचं समर्थन केलं. “स्वार्थी असणं आणि स्वत:चा विचार करणं यावर माझाही पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्ही स्वत: खुश नसाल, तेव्हा दुसऱ्यांना तुम्ही कसं खुश ठेवू शकता? तुम्ही जितके जास्त दिवस खोटं बोलून जगण्याचं ढोंग करत राहाल, तितकं तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा राग येऊ लागेल आणि नंतर तुम्ही स्वत:चाही रागराग कराल. मला वाटतं की प्रत्येकाने स्वत:साठी जगलं पाहिजे. स्वत:साठी जगण्यासाठी हिंमत लागते. फार कमी लोकांना ही गोष्ट जमते,” असं मत अक्षयने मांडलं होतं.