मालदीव भारताजवळ येत असतानाच आणखी एक देशाने चीनला फटकारलं

| Updated on: Oct 05, 2024 | 6:19 PM

मालदीवमध्ये सत्तेत आल्यापासून भारताविरोधात जात चीनसोबत अधिक जवळीक साधणाऱ्या मुइज्जू यांना आता भारताची ताकद काय हे लक्षात आले आहे. त्यानंतर आता ते भारत दौऱ्यावर येत आहेत. पण त्याआधीच चीनला आणखी एक धक्का बसला आहे, या देशाने भारताच्या विरोधात आपल्या जमिनीचा वापर होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात चीनला फटकारले आहे.

मालदीव भारताजवळ येत असतानाच आणखी एक देशाने चीनला फटकारलं
Follow us on

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारत दौऱ्यावर येत असल्याने चीनच्या आधीच पोटात दुखू लागले आहे. कारण सत्तेत आल्यापासून मुइज्जू हे चीनच्या बाजुने अधिक झुकलेले दिसत आहे. आता त्यांच्या भारत दौऱ्यामुळे चीन देखील अधिक सतर्क झाला आहे. मालदीवला भारतापासून लांब करण्यासाठी चीनने अनेक प्रयत्न केले. मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांना मात्र नंतर ही गोष्ट कबूल करावी लागली की, त्यांचे भारतासोबत संबंध बिघडले. पण त्यांनी भारताला मालदीवसोबत संबंध बिघडू नये म्हणून आवाहन देखील केले. भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या मुइज्जू यांना अखेर भारताने दणका दिल्यानंतर जाग आली. कारण भारताने मालदीवच्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लावला. मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्थही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भारतीयांना मालदीववर बहिष्कार टाकला आणि मालदीवला धक्का बसला.

भारताबाबतचे मत बदलले

आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची श्रीलंका भेट दिल्यानंतर श्रीलंकेचे ही भारताबाबतचे मत बदलले आहे. चीन नेहमीच आपल्या शेजारी देशांचा फायदा घेत भारताला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो. पण भारत नेहमी आपल्या शेजारीला देशांना पहिली मदत करण्याचं धोरणं स्वीकारतो. चीन पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यांना पैशांचं अमिष दाखवून जवळ करतो. पण कर्ज जास्त झाल्यावर त्यांना आपल्या तालावर नाचवतो. हे श्रीलंकेच्या लक्षात आले आहे.

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटीदरम्यान श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी चीनला फटकारले आहे. अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी सांगितले की, श्रीलंकेची जमीन भारताविरुद्ध कारवायांसाठी वापरू देणार नाही. आमचे सुरक्षेचे हित एकमेकांशी जोडलेले आहे यावर दोन्ही देशांनी भर दिला.

भारताकडून आर्थिक मदतीचे आश्वासन

भारताने श्रीलंकेला त्याच्या अर्थव्यवस्थेच्या पुन्हा वर आणण्यासाठी  पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर श्रीलंकेने सांगितले की, आपल्या भूभागाचा वापर ते  भारताच्या सुरक्षेच्या हितसंबंधांना प्रतिकूल रीतीने होऊ दिला जाणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके म्हणाले की, समृद्ध श्रीलंकेचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताचे आर्थिक पाठबळ महत्त्वाचे आहे.

दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) सरकार 23 सप्टेंबर रोजी सत्तेवर आल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे जयशंकर हे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी आश्वासन दिले की भारत श्रीलंकेसोबत द्विपक्षीय कर्ज पुनर्रचनेबाबत सामंजस्य करार करेल आणि खाजगी रोखेधारक कर्ज पुनर्रचना कराराला पाठिंबा देईल. दिसानायके यांच्या भेटीदरम्यान, जयशंकर यांनी ऊर्जा निर्मिती आणि ट्रान्समिशन आणि इंधन आणि एलएनजी पुरवठा या क्षेत्रात सुरू असलेले उपक्रम, बेट राष्ट्रासाठी आर्थिक स्थिरता आणि महसूलाचे नवीन स्त्रोत कसे प्रदान करतील यावर भर दिला.