India maldive row : मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, आता माजी राष्ट्राध्यक्षांनी देखील यावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. मालदीवमध्ये इंडिया आऊटचा नारा देत सत्तेत आलेला मोईज्जू आता भारतविरोधी वक्तव्य करत आहेत. पण आता माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे सूर आता बदलल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारतासोबतचे दीर्घकाळचे मैत्रीपूर्ण संबंध बिघडले आहेत. मंगळवारी रात्री पीपल्स नॅशनल फ्रंट (PNF) कार्यालयात झालेल्या मेळाव्यात बोलताना यामीन यांनी दावा केला की मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्यासाठी “इंडिया आउट” चळवळ सुरू करूनही त्यांचा भारताप्रती कोणताही वैयक्तिक हेतू किंवा वैर नाही.
यामीन म्हणाले की, “जबाबदार पदांवर असलेल्या तीन लोकांनी अपमानास्पद भाषा वापरली. हे भारत सरकार स्वीकारू शकत नाही.” यामीन यांनी भारताविरुद्धच्या “वैयक्तिक हल्ल्यांपासून” स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणाले की “इंडिया आउट”चा नारा हा फक्त मालदीवच्या हद्दीतून भारतीय सैन्याला माघारी पाठवण्यासाठी होता.
यामीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर ते आता तुरुंगवासात आहे. निवडणुकीत यामीन यांनी पाठिंबा दिलेल्या आघाडीच्या विजयानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली असली तरी ते नजरकैदेत आहेत. त्यांनीच आधी मालदीवमध्ये इंडिया आऊटचा नारा दिला होता. ते राष्ट्राध्यक्ष असतानात भारत आणि मालदीव यांच्यात एक भारतीय हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमान स्वीकारण्यास सहमती दर्शविली होती. 2016 मध्ये यामीन जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार झाले होते.
अब्दुल्ला यामीन हे चीन समर्थक मानले जातात. त्यांनी देखील भारताशी वैर घेतले होते. यामीन यांनी भारताला आपली हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने परत बोलावण्याचे आवाहन केले होते. यामीन यांने बेकायदेशीरपणे चीनला बेट देण्याचा प्रयत्नही केला होता. चीनकडून कर्ज घेतल्यामुळे मालदीवला कर्जबाजारी करण्यात त्यांचा ही हात होता.