मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मारली पलटी, पाहा आता भारताबाबत काय म्हणाले

| Updated on: Sep 27, 2024 | 6:23 PM

गेल्या वर्षी मालदीवमध्ये सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू यांची भूमिका आता भारताबाबत मवाळ होताना दिसत आहे. भारत दौऱ्यावर येण्याआधी त्यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत त्यांच्या देशाचे संबंध तणावाचे झाले आहेत. चीन समर्थक नेते असल्याने ते भारताच्या विरोधात असल्याचं देखीव बोललं जातंय.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मारली पलटी, पाहा आता भारताबाबत काय म्हणाले
Follow us on

भारत आणि मालदीवमधील संबंध तेव्हा बिघडले जेव्हा मोहम्मद मुइज्जू हे सत्तेत आले आणि त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित भारतीय सैनिकांना परत जाण्याच्या सूचना केल्या. मुइज्जू हे चीन समर्थक असल्याने त्यांची भारताबाबतची भूमिका ही विरोधी असल्याचं बोललं जात होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यानंतर संबंध आणखी ताणले गेले. मालदीवने तिन्ही मंत्र्यांना निलंबित करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी इंडिया आउटचा नारा देत सत्तेत आलेय. पण आता त्यांनी आपण हे धोरण कधीच पाळले नाही, असे म्हटले आहे.

मुइज्जू यांची भूमिका बदलली

मुइज्जू म्हणाले की, त्यांच्या सरकारने भारतीय सैन्याला मालदीव सोडण्याचे आदेश दिले कारण परदेशी सैन्याची उपस्थिती ही एक गंभीर समस्या होती. त्यांच्या देशातील लोकांना परदेशी सैन्य त्यांच्या भूमीवर नको होते. मुइज्जू यांनी आपल्या भारत दौऱ्याच्या काही वेळेआधी या गोष्टी सांगितल्या आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.

मालदीवमधील न्यूज पोर्टल adhadhu.com शी बोलताना मुइज्जू म्हणाले की, ‘आम्ही कधीही एका देशाच्या विरोधात नाही. आम्ही कधीही इंडिया आऊटबद्दल बोललो नाही पण हे सत्य आहे की मालदीवच्या लोकांना त्यांच्या भूमीवर एकही परदेशी सैनिक नको होता. आम्ही या भावनेचा आदर केला. मोहम्मद मुइज्जू सध्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९ व्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत.

नरेंद्र मोदींवर टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल चुकीच्या प्रतिक्रिया देणाऱ्या त्यांच्या नेत्यांवर कारवाई केल्याचेही मुइज्जू म्हणालेत. मी कोणाचाही असा अपमान स्वीकारणार नाही, प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा असते. असे ही ते म्हणाले.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिघडले होते. मुइज्जू यांनी ‘इंडिया आउट’च्या नारा देत निवडणूक लढवली होती. मालदीवच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी भारतीय सैनिकांच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आणि त्यांना देश सोडण्यास सांगितले मात्र आता त्यांचे सरकार भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अलीकडेच मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कौतुक केले होते.