तुमच्या हातात बहुमत आहे..मग शरद पवारांची का वाट बघता?, जरांगे पाटील यांचा इशारा

| Updated on: Jul 16, 2024 | 2:59 PM

मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत. ते म्हणाले की आमरण उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाय...त्यामुळे आपण उपोषण करणारच असे पाटील यांनी ठणकावले आहे.

तुमच्या हातात बहुमत आहे..मग शरद पवारांची का वाट बघता?, जरांगे पाटील यांचा इशारा
chhagan bhujbal and manoj jarange patil
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने सरकारच्या पोटात गोळा आला आहे. त्यातच महायुतीच्या आरक्षणाच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याने महायुती अडचणीत आली आहे. या प्रकरणाची कोंडी जर फुटली नाही तर पुन्हा महायुतीला विधानसभेतही फटका बसू शकतो असे म्हटले जात आहे. काल, सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन ओबीसी आणि मराठा आरक्षण वादात तोडगा काढण्याची विनंती केली होती. यावर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांवरही टीका केली आहे.तसेच आमरण उपोषणावर आपण ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

ओबीसी- मराठामध्ये ते तेढ निर्माण करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांना आणखी तेढ निर्माण करायची आहे. म्हणून ते स्फोटक वातावरण यांसारखे शब्द मुद्दामहून वापरत आहेत. जेव्हा छगन भुजबळ गोड बोलतात आणि म्हणतात मला शांतता पाहिजे आणि ‘स्फोटक वातावरण’ असे शब्द वापरतात. त्यावेळेस मीडिया आणि नेत्यांसमोर सांगतात की राज्यातील वातावरण शांत झाले पाहीजे तेव्हाच ते नेहमी काहीतरी डाव टाकतात असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले, तेव्हा ते जेलमधून बाहेर निघाले आणि केसेसही परत घेतल्या असाही आरोप पाटील यांनी केला आहे.भुजबळ ज्या पक्षात जातात त्या घराचे वासे मोजतात. भुजबळ यांचा डाव होता की भाजप आणि देवेंद्र फडवणीस संपले पाहिजे, शिंदे साहेबांपासून सर्व संपले पाहिजेत. यामुळे मधल्या काळात छगन भुजबळ खूप विरोधात बोलले. त्यांचेच खाल्ले आणि त्यांच्याच विरोधात बोलले. कालही शरद पवारांची भेट घेताना छगन भुजबळ यांनी डाव टाकला असावा अशी शंका असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

भुजबळ मुद्दामहून वेळ न घेताच भेटायला गेले

भुजबळ जिथे जातात तिथे डाव घेऊनच जातात. त्यांना ओबीसीचं काही देणं घेणं नाही. छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत. जर शरद पवार यांनी भेट दिली नसती तर बाहेर येऊन भुजबळ यांनी आरोप केला असता की, शरद पवार मराठ्यांचे विरोधक आहेत म्हणून ते मला भेटले नाहीत ! भुजबळ आरक्षणासाठी कुणालाही भेटत नाहीत असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

…त्यांच्या पाठाडात लाथ मारा..

शरद पवार यांना मराठ्यांच कधीच चांगलं व्हाव वाटत नाही. महाविकास आघाडीला मराठ्यांच कधीच चांगलं व्हावे असं  वाटत नाही का ?  मराठ्यांचं चांगलं व्हावं तशी तुमची विचारधारा आहे का..? शरद पवार नाही आले तर नाही आले जाऊ द्या त्यांना, त्यांच्या पाठाडात लाथ मारा. सत्ता, बहुमत तुमच्या हातात आहे. तुम्हालाच आरक्षण द्यायचे नाही, एकमेकांवर ढकलायचे याची आणि ही सवय तुम्हाला पहिल्यापासून आहे असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.