हल्लीच्या काळात टक्कल पडणं ही एक सामान्य समस्या झाली आहे. केस गळणं आणि टक्कल पडणं या समस्या आता केवळ वयोवृद्धांशी संबंधित राहिलेल्या नाहीत. बदलती जीवनशैली, पोषकतत्त्वांच अभाव किंवा अनुवांशिक कारणांमुळे ऐन तारुण्यातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडल्याची समस्या जाणवते. यावर मार्केटमध्ये हजारो प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मग ते हेअर ऑइल असो, शाम्पू असो, सिरम असो किंवा मसाजचं एखादं साधन असो.. डोक्यावर पुन्हा नव्याने केस उगवण्याची किंवा टक्कल घालवण्याची हमी देत हे प्रॉडक्ट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यातही महागडे प्रॉडक्ट्स किंवा तेल वापरून टक्कल पूर्णपणे गेल्याचं किंवा नव्याने केस उगवल्याची उदाहरणं फारच क्वचित पहायला मिळतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये ‘आदिवासी हेअर ऑइल’ची विशेष चर्चा पहायला मिळतेय. या हेअर ऑइलची जाहिरात मोठमोठे सेलिब्रिटीही करू लागल्याने अनेकजण त्याकडे आकर्षित झाले आहेत. हे आदिवासी हेअर ऑइल आहे तरी काय, त्याची जाहिरात इतके मोठे सेलिब्रिटी का करत आहेत, हे तेल खरंच टक्कल घालवण्यावर आणि केस गळण्याच्या समस्येवर परिणामकारक आहे का, या तेलाच्या नावाने ग्राहकांची कोणती फसवणूक केली जातेय का.. यांसारखे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात आहेत.
मान्सून सुरू होताच सोशल मीडियावर या तेलाच्या अनेक जाहिराती पहायला मिळत आहेत. या तेलाचा आदिवासी समाजाशी संबंध जोडून त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातोय. आदिवासी हा ‘आदि’ आणि ‘वासी’ या दोन शब्दांपासून बनला असून त्याचा अर्थ ‘मूळ’ असा होतो. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजपुरा गावातील रहिवासी, हक्की पिक्की आदिवासी समुदाय हे विशेष तेल तयार करत आहेत. ज्याचा ते आदिवासी तेलाच्या नावाने प्रचार करत आहेत. या तेलाचं वर्णन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये करण्यात आलं आहे. आयुर्वेदच्या चरस संहिता, सुश्रुत संहिता यांमध्ये आदिवासी तेलाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं संपूर्ण वर्णन करण्यात आलं आहे. हे तेल तयार करण्यासाठी कमीत कमी 13 आणि जास्तीत जास्त 250 वनौषधींचा उपयोग केला जातो. म्हैसूर जिल्ह्यातील हक्की पिक्की समुदायाचे लोक या तेलाचा प्रचार करत असले तरी त्यासाठी लागणारे वनौषधी उपलब्ध असल्यास हे तेल कोणीही विधीविधानानुसार बनवू शकतो.
“हे तेल प्राचीन काळापासून वापरलं जातंय. त्यात नवीन असं काहीच नसून शतकानुशतके जुन्या मिश्रणांपासून, औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं हे तेल आहे. जे केसांसाठी तसंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल 108 औषधी वनस्पतींच्या मिश्रणापासून तयार केलं जातं. खोबरेल आणि तिळाच्या तेलात या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. यामध्ये आढळणाऱ्या बहुतांश औषधी वनस्पती मेंदुला थंडावा देतात,” अशी माहिती तज्ज्ञ शिवकुमार यांनी दिली.
शिवकुमार यांनी असंही सांगितलं आहे की जर केसांच्या मुळात जीव असेल तर टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी रोज रात्री 15 ते 20 मिनिटं डोक्याला तेलाने मसाज करावं लागेल. या तेलाच्या नियमित वापराने केस दोन ते तीन महिन्यांत वाढू शकतात, असाही दावा त्यांनी केला आहे. “आम्ही लोकांच्या मागणीनुसार हे आदिवासी तेल तयार करतो. हे तेल तयार करण्यासाठी आम्हाला दोन महिने लागतात. तिळ आणि खोबरेल तेलात 108 प्रकारची वनौषधी वापरून हे तेल तयार केलं जातं”, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडियावर ‘आदिवासी तेला’चा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातोय. या तेलाची विक्री करणारे लोक मोठमोठे दावेही करत आहेत. याविषयी हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आणि त्वचा विशेषज्ज्ञ डॉ. गौरांग कृष्णा यांनी ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आदिवासी हेअर ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर असं म्हटलं गेलंय की त्यात त्यांनी किमान 100 औषधी वनस्पतींचा वापर केला आहे. पण त्यातील बहुतांश घटक सारखेच आहेत, जे सर्वसाधारणपणे इतक्या वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेलात मिसळले जात आहेत. भृंगराज, ब्राह्मी, आवळा, कोरफड, जास्वंदाचं फूल.. हेच सर्व त्यात आहे. बाजारात याआधीही अनेक प्रॉडक्ट्स आले आहेत, पण त्याने लोकांच्या डोक्यावर नवीन केस आले नाहीत. माझ्या रुग्णांनीही या तेलाचा वापर केला आहे आणि त्यातून मला संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. टक्कल पूर्णपणे घालवणं कठीण आहे, पण जर एखाद्याला ऋतुनुसार केस गळणे किंवा कमी वयातच केस गळण्याचा त्रास होत असेल तर हा पर्याय वापरून पाहू शकतात. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.”
डॉ. गौरांग यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, त्यांना अशा प्रकारच्या तेल विक्रीमुळे कोणतीही समस्या नाही. पण ज्या प्रकारचे दावे ते करत आहेत, ते वैज्ञानिकदृष्ट्या त्यांना योग्य वाटत नाहीत. “तथ्यांच्या आधारे बोलायचं झाल्यास, अनेकांना टक्कल पडल्याची समस्या जाणवते आणि हल्लीच्या काळात ही जगभरातील एक मोठी समस्या आहे. त्यांच्या दाव्यात इतकं सत्य असेल तर आतापर्यंत त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असतं”, असं ते म्हणाले.
प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. अशोक सिन्हा यांनी ‘आदिवासी तेला’विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याविषयीचा एका व्हिडीओच त्यांनी युट्यूबवर अपलोड केला आहे. त्यात ते म्हणाले, “आदिवासी तेलात 100 हून अधिक औषधी वनस्पती आहेत, अशी जाहिरात केली जातेय. परंतु विविध प्लॅटफॉर्म्सवर ही संख्या बदलत जाते. काही 100 म्हणतात तर काही 108, काही तर 180 ही म्हणतायत. त्यामुळे या दाव्यांच्या सतत्येवर प्रश्न उपस्थित होतो. दुसरी गोष्ट म्हणजे या तेलाची उत्पादन पद्धत ही पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींशी जुळत नाही. अस्सल आयुर्वेदिक तेल हे हर्बल इसेन्सचा समावेश करून सूक्ष्म प्रक्रियेद्वारे बनवलं जातं. आदिवासी तेलाच्या प्रक्रियेत अत्यंत सोपी पद्धत वापरली गेली आहे. ते थेट गरम तेलात औषधी वनस्पती मिळतात. खोबरेल तेल आणि बदाम तेल यांसारख्या तेलांच्या वापरामुळे गुणवत्ता आणि प्रभावीपणा यावरही प्रश्न उपस्थित होतो. बेस ऑइल शुद्ध नसेल तर ते उत्पादनाच्या एकूण गुणवत्तेशी आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांशी तडजोड होऊ शकते.”
आदिवासी हेअर ऑइलच्या जाहिरातींमुळे ग्राहक त्याकडे सर्वाधिक आकर्षित झाल्याचं पहायला मिळालं. मोटिव्हेशनल स्पीकर सोनू शर्मा, युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव, अभिनेता सोनू सूद, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान, कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा, मिस्टर इंडियन हॅकर दिलजीत राणा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या तेलाची जाहिरात केली आहे.
आदिवासी तेलाची वाढती प्रसिद्धी आणि प्रचार पाहून त्याच नावावरून काही बनावट तेलसुद्धा बनवले जात आहेत. ‘आदिवासी तेल’ याच नावाने ही बनावट उत्पादनं ग्राहकांना विकली जात आहेत. युट्यूब किंवा विविध व्हिडीओंमध्ये मोबाइल नंबर देण्यात आला असून त्यावरून ग्राहकांना ऑर्डर देण्यास सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात असे अनेक बनावट प्रॉडक्ट्स बाजारात विकले जात आहेत. ‘आदिवासी तेल’ हे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर केलं जाऊ शकतं किंवा त्यांच्या अधिकृत मोबाइल नंबरवर Whats App कॉल करूनच त्याची ऑर्डर दिली जाऊ शकते. त्यानंतर 1500 रुपयांना 500 मिलीलीटर तेलाची बाटली तुम्हाला घरपोच दिली जाते. यात ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चाही पर्याय आहे. मात्र काही बनावट तेल हे फक्त 500 रुपयांना ‘बाय वन गेट वन’च्या ऑफरसह विकले जात आहेत. बनावट तेलाच्या बाटलीत कोणतेही वनौषधी दिसून येत नाहीत. तर मूळ तेलाच्या बाटलीत ही वनौषधी दिसून येते.
आदिवासी तेल हे 180 वनौषधींपासून बनवलं जातं आणि ही सर्व वनौषधी ते स्वत: जंगलातून आणतात. या तेलाची अर्धा लीटरची बाटली 1500 रुपयांना आणि एक लीटरची बाटली महिलांसाठी 2500 रुपयांना मिळते. त्यासाठी मोफत कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा असून व्हॉट्स ॲपद्वारे ग्राहक ऑर्डर देऊ शकतात. “आदिवासी तेलाच्या वापराने मूळापासून तुटलेले केस नव्याने येऊ शकतात. पण ज्यांना पूर्ण टक्कल आहे, त्यांच्या डोक्यावर नव्याने केस उगवणार नाहीत. केसांची गुणवत्ता सुधारणं, गळती थांबवणं, कोंडा मिटवणं आणि केसांना बळ देणं.. यासाठी आदिवासी तेल गुणकारी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
Disclaimer: या लेखात औषधं आणि आरोग्यविषयक सल्ले हे तज्ज्ञांशी बोलून त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. ही सर्वसामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर वापरावी. कोणत्याही वापरामुळे झालेल्या नुकसानीस ‘टीव्ही 9’ जबाबदार राहणार नाही.