पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या पाच हजार जादा गाड्या, ग्रुप बुकींग केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा

| Updated on: Jun 11, 2024 | 6:27 PM

गेल्यावर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 4,245 जादा बस गाड्या सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये 18 लाख, 30 हजार, 936 प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या पाच हजार जादा गाड्या, ग्रुप बुकींग केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा
5000 extra Buses For Msrtc for Pandharpur Ashadhi Yatra
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई – पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी ‘विठू नामाचा जयघोष’ करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकींग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुरला आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर पायी चालत दिंडीने येत असतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 40 पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी ‘महिला सन्मान योजना’ यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.

फुकटया प्रवाशांना लगाम

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकांकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांचा अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत.

वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांदयाला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी एसटी पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकऱ्यांसाठी विविध विभागांतून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग ( आयटीआय कॉलेज ) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक   अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बस स्थानकाचे नाव आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

1 ) चंद्रभागा बसस्थानक       –   मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगार
2 ) भिमा यात्रा देगाव            –   छत्रपती संभाजी नगर , नागपूर आणि अमरावती प्रदेश
3 ) विठ्ठल कारखाना             –  नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
4 ) पांडुरंग बसस्थानक         –  सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग