तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अजितदादांची गैरहजेरी

| Updated on: Sep 14, 2024 | 11:28 PM

लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच या योजनेच्या शासकीय कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर राहिले. कार्यक्रम मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघात होता.

तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अजितदादांची गैरहजेरी
Follow us on

लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासून सरकारी कार्यक्रमाला अजित पवारांनी आज पहिल्यांदा गैरहजेरी लावली. कार्यक्रम धाराशीवमधील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात होता. मात्र तानाजी सावंत यांच्या विधानावरुन आधीच नाराज असलेले अजित पवार या कार्यक्रमाला हजर राहतील की नाही, यावरुन शंका वर्तवल्या जात होत्या. प्रत्यक्षात अजित पवारांनी गैरहजर राहून पुण्यातील कार्यक्रमांना हजेरी लावली. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर राहणार होते. मात्र जे.पी.नड्डांच्या मुंबई दौऱ्यावर फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. तर अजित पवार पुण्यात व्यस्त होते. त्याबद्दलचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केला.

याआधी जेव्हा अमित शाहा मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाही अजित पवारांची गैरहजेरी होती. नंतर दौरा आटोपून शाहा विमानळावर पोहोचल्यानंतर अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. आणि यावेळी परांडातल्या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात अजित पवार गैरहजर राहिले.

तिन्ही नेत्यांच्या समर्थकामध्ये लाडक्या बहिणीच्या श्रेयावरुन वाद रंगतो आहे. पण तो वाद आता मिटल्याचं सांगत मंत्री शंभुराज देसाईंनी एका पोस्टरकडे बोट दाखवत तिन्ही नेत्यांचे फोटो असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात तिथं केवळ अजित पवारांचाच फोटो असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकी बहिण योजना ही मुख्यमंत्री शिंदेंनीच आणल्याचा पुनरुच्चारही देसाईंनी केला आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी सभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते ही चांगलेच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. शिवसेना नेते भरत गोगावले यांनी तानाजी सावंत यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटले होते.