मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या काय असतात त्याचे फायदे

| Updated on: Oct 03, 2024 | 8:58 PM

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय फायदा होतो जाणून घ्या.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या काय असतात त्याचे फायदे
Follow us on

ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) या बाबत निर्णय घेत असतो. आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात

1) भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य  मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे मी आभार मानतो. इतक्या वर्षांपासूनची मागणी पीएम मोदींनी मान्य केली. आजपासून आपली भाषा अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा सुवर्ण दिवस आहे. राज्यातील १२ कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातील मराठी जणांच्या वतीने मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो.