अमरावती आणि साताऱ्याचा एक्झिट पोल आला पुढे, पाहा कोणाला बसतोय धक्का

| Updated on: Jun 01, 2024 | 7:46 PM

Exit poll loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. ज्यामध्ये सातारा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात कोणाला आघाडी मिळताना दिसत आहे. जाणून घ्या काय म्हणतोय एक्झिट पोल.

अमरावती आणि साताऱ्याचा एक्झिट पोल आला पुढे, पाहा कोणाला बसतोय धक्का
Follow us on

राज्याचे लक्ष लागलेल्या अमरावती आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे. येथून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अघाडीवर दिसत आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना येथून उमेदवारी दिली होती. पण ते पिछाडीवर दिसत आहेत. २००४ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समर्थनावर निवडून आल्या होत्या.

नवनीत राणा जागा राखणार

यंदा नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण ते देखील पिछाडीवर आहेत. निवडणुकीत कमी मतदान झाल्याने याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा देखील येथे सुरु आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांत एकही ठिकाणी भाजपचा आमदार नाही. पण तरी देखील येथून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आघाडी घेतलेली दिसत आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देऊन त्या भाजपमध्ये आल्या होत्या. पण युवा स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी येथे त्यांच्या विजयासाठी जोर लावला होता.

साताऱ्यात भाजप पिछाडीवर

सातारा लोकसभा मतदारसंघात देखील कांटे की टक्कर दिसत होती. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. उदयराजे यांनी येथून विजयाचा दावा केला आहे. पण एक्झिट पोलनुसार उदयनराजे पिछाडीवर दिसत आहेत. उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) अशी थेट लढत होती. महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येत होती. पण, उदयनराजे यांच्या आग्रहाखातर ही जागा त्यांना देण्यात आली होती. २०१९ च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीनिवास पाटील हे त्यावेळी विजयी झाले होते.