औरंगाबाद: दसऱ्याच्या दिवशी सोन्यासारखं महत्त्वा प्राप्त झालेल्या आपट्याच्या झाडांची संख्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शमी, कांचन व आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी अक्षरशः झाडापासून ओरबडली जातात. त्यामुळेच या वृक्षाचे संवर्धन होण्यासाठी दसऱ्याला आपट्याची पाने न तोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिल्लोड तालुक्यातील बहुली गावकऱ्यांनी घेतला आहे.
पांडव जेव्हा वनवासात गेले होते, तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली ठेवली होती. म्हणून शमीची पाने तोडून एकमेकांना देण्याची प्रथा पडली. कौत्स्य नावाच्या विद्वानाला त्याच्या गुरुंना गुरुदक्षिण देता यावी म्हणून कुबेराने आपट्याच्या पानाचं सोन्यात रुपांतर केलं. गुरुदक्षिणा दिल्यावर उरलेली पाने दसऱ्याच्या दिवशी अयोध्येत वाटली तेव्हापासून ही प्रथा सुरु झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. मात्र कालांतराने या वृक्षांचे प्रमाण कमी होत गेले. या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले. आता ही झाडे नामशेष होऊ लागली आहेत.
आपटा हा औषधी वृक्ष असून कफ विकार व मुतखडा या विकारावर त्याची पाने अति गुणकारी आहेत. शमी उष्णता व पित्त विकार यावर उपयोगी आहे. या वृक्षाची पाने प्रथेच्या नावाखाली ओरबाडली जात असल्याने नामशेष होत जातील. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे, असे अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील, किरण पवार यांनी सांगितले.
आपटा, शमी या झाडांना डिसेंबरमध्ये शेंगा लागतात, मात्र दसऱ्याला या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात ओरबाडली जात असल्याने त्याला शेंगा लागत नाहीत. परिणामी या झाडांचे बीजोत्पादन होत नाही. येत्या काळात असेच सुरु राहिले तर आपटा वृक्ष नामशेष होणार, असे तज्ज्ञांचे मत आहे.
इतर बातम्या-