मोठी बातमी! बच्चू कडू आणि संभाजीराजे विधानसभेला एकत्र येणार, महाराष्ट्राच्या जनतेपुढे आता नवा पर्याय उभा राहणार

| Updated on: Jul 09, 2024 | 12:10 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे 9 ऑगस्टला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! बच्चू कडू आणि संभाजीराजे विधानसभेला एकत्र येणार, महाराष्ट्राच्या जनतेपुढे आता नवा पर्याय उभा राहणार
बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी या स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा राजर्षी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. स्वराज्य संघटनेचं आता पक्षात रुपांतर होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरु आहे. आता ही संघटना प्रत्यक्षात राजकारणात सक्रिय होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले डॅशिग नेते आमदार बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत राजकीय मैत्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे मोठा पर्याय उभा राहणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे 9 ऑगस्टला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू आणि संभाजीराजे यांची एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे. दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. बच्चू कडू अनेकदा शेतकरी, कष्टकरींच्या प्रश्नांसाठी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. तर संभाजीराजे हे कोल्हापूर गादीचे वंशज असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिवप्रेमींच्या मनात एक वेगळा आदर आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना आगामी विधानसभेत आपापल्या प्रतिमेचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्ष विधानसभेच्या किती जागांवर निवडणूक लढवतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती

संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. या संघटनेचं रुपांतर आता पक्षात होणार आहे. या पक्षाचं रजिट्रेशनदेखील करण्यात आलं आहे. संभाजीराजे येत्या 9 ऑगस्टला याबाबत घोषणा करणार आहेत. दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचीदेखील संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. हे दोन्ही नेते आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

एकीकडे तिसरी आघाडीची चर्चा आता बच्चू कडू आणि संभाजीराजेंची युती

आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाकुणाची आघाडी किंवा युती असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे महायुतीचे घटक पक्ष, दुसरीकडे महाविकास आघाडी. तर राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. असं असताना आता बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र निवडणूक लढवून महाराष्ट्राच्या जनतेपुढे नवा पर्याय निर्माण करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घाडमोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.