‘सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर…’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 24, 2024 | 10:35 PM

"धर्म, जात आणि पैसा या तीन गोष्टींचा अतिशय ताकदीने या निवडणुकीत वापर झाला. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करून मतदान घेण्याचा प्रकार झाला. ते लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे", अशी प्रतिक्रिया प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर..., बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
आमदार बच्चू कडू
Follow us on

“लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी निवडणुका असतात. त्या निवडणुका स्पष्ट, निस्वार्थ आणि निष्पक्षपणे झाल्या पाहिजेत. त्या होताना दिसत नाही. तेव्हा लोक परिस्थिती आपल्या हातात घेतात. कुठलाही सत्ताधारी असू दे मग ते भाजपवाले किंवा काँग्रेसवाले, सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करून घेणे चुकीचं आहे. धर्म, जात आणि पैसा या तीन गोष्टींचा अतिशय ताकदीने या निवडणुकीत वापर झाला. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करून मतदान घेण्याचा प्रकार झाला. ते लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे”, अशी प्रतिक्रिया प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकांची याबद्दल निराशाच असू शकते. मतदान घटण्याची वेगवेगळी कारण असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे निराशा असू शकते”, असं बच्चू कडू म्हणाले. “लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मी त्याचा तेवढा अभ्यास केला नाही. घोडा मैदान जवळ आहे. चार तारखेला सगळं स्पष्ट होईल. तुमच्याकडे सर्वे असतात. अभ्यास असतो. ते तुम्ही दाखवा. आम्ही मत मागणारी लोक आहोत. मत देणारे लोक आहोत. सर्व्हे करणारे तुमच्याकडे असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘आतापर्यंतच्या पन्नास-साठ वर्षाचा हिशोब घेतला तर…’

बच्चू कडू यांनी डोंबिवलीच्या स्फोटाच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली. “दरवर्षी या घटना घडतात. त्यात काही कोणी उद्योगपती मारताना पाहिला नाही. कोणी मरू नये. पण जे काही आतापर्यंतच्या पन्नास-साठ वर्षाचा हिशोब घेतला तर यात लहान मजूर, कामगार मरतात. आणि त्या अदाखलपात्र असतात. या घटना डिजीटल आणि आधुनिक काळात घडत आहेत. फॅक्टरीच्या बाजूला घरं आहेत. त्याला परवानगी मिळाली कशी?”, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

“करप्शन एवढं वाढलं आहे की मरण्याची भीती कुणाला राहिली नाही. मरणारा गरीब आणि कामगार आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा बदलला आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते. प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहेत. बंधन कशी येणार? कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काहीच पडलं नाही. पैशांच्या भरोशावर मत खेचली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या मरणाला काही अर्थ नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.