Sharad Pawar | शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना बीडच्या सभेत ‘पुन्हा’ डिवचलं, पाहा नेमकं काय म्हणाले

| Updated on: Aug 17, 2023 | 5:58 PM

शरद पवार यांनी आजच्या बीडच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा डिवचलं आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खोचक सल्ला दिला आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar | शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना बीडच्या सभेत पुन्हा डिवचलं, पाहा नेमकं काय म्हणाले
Follow us on

बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा उल्लेख करत मोदींना खोचक सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार सत्तेत सहभागी होण्याआधी सुद्धा शरद पवार आणि फडणवीस यांच्या वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं होतं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचं भाषण करत असताना मी पुन्हा येईन, असं सांगितलं. माझी त्यांना एक विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं आहे, तुम्ही जी घोषणा केली त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या”, असं शरद पवार म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले. पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर खालच्या पदावर. आता पंतप्रधान म्हणत आहेत की, मी पुन्हा येईन. आज आहे त्या पदाच्या खाली कुठे जायचं आहे याचा विचार करुन पुढचं पाऊल टाका”, असा खोचक सल्ला शरद पवारांनी दिला.

शरद पवार यांचा भाजपवर घणाघात, नेमकं काय-काय म्हणाले? वाचा…

“देशातलं चित्र वेगळं आहे. चमत्कारीक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या जपवणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. जात, धर्म आणि भाषा यामधून समाजात अतंर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. जयंतरावांनी सांगितलं की, किती प्रश्न आहेत. महागाईचा प्रश्न आहे, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कुठे गेल्या ते आपल्याला माहिती आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“उत्तम शेती करायची असेल तर पाऊसपाणी हवंय. पाऊसपाणी असल्यानंतर बी-बियाणे, खतं लागतात, आज खतांच्या किंमती कुठपर्यंत गेल्या आहेत? शेतकऱ्यांना कितीला मिळतात. काळी आईची सेवा करणारा शेतकरी हा अतिशय भयभीत आहे, या सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही”, असा आरोप शरद पवारांनी केला.

“कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. आज काय चित्र दिसतंय. मणिपूर या देशाच्या उत्तरेकडचा भाग, तिथे अनेक राज्य आहेत. मणिपूर, नागालँड, सिक्किम, अरुणाचल आहेत. पण अतिशय महत्त्वाची राज्य आहेत. प्रत्येक राज्याचा शेजारचा भाग हा पाकिस्तान किंवा चीनकडे आहे. या दोन्ही देशाची नजर हिंदुस्थानकडे चांगली नाही. संकट आलं तर तिथून काय होईल याची खात्री नाही. म्हणून सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं”, असं पवार म्हणाले.

“मणिपूर आज पेटतंय. समाजासमाजात भांडणं झाली. गावागावात अंतर पडलं. हल्ले होत आहेत. घरं जाळली जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आणि हे सगळं होत असताना सुद्धा देशाचं भाजप सरकार कोणत्याचप्रकारचे पावलं टाकत नाहीत. देशाचे पंतप्रधानांनी इतकं झाल्यानंतर मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण पंतप्रधानांनी मणिपूरला ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. पार्लिमेंटच्या अधिवेशनावेळी ते फक्त तीन मिनिटे बोलले आणि अविश्वासाच्या ठरावावेळी आणखी दोन-तीन मिनिटे बोलले. पण मणिपूरच्या बघिणींचं दु:ख देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही”, असा आरोप शरद पवारांनी केला.

“केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडण्याचा उद्दोग केला जातो. गोव्याचं सरकार पाडलं होतं. कर्नाटकमध्ये सरकार पाडलं होतं. उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रातील सरकार पाडलं. कमलनाथ यांच्या नेतृत्वातील मध्यप्रदेशातील सरकार पाडलं होतं. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करतात आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारं केंद्रातील सरकार वापरून उद्ध्वस्त करता. त्यातून तुम्ही सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतात. ही सर्व आव्हानं आपल्यापुढे आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते योग्य पद्धतीने वागत नाहीत”, अशी टीका शरद पवारांनी केली.

“जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे शहरात सरकारी रुग्णालयात 18 लोकांचा जीव गेला. त्याच बालकं, आया-बहिणी होत्या. दोन दिवसात सरकारी रुग्णालयात 18 लोक मृत्यूमुखी पडतात आणि हे राज्य सरकार बघ्याची भूमिका घेतं, याचा अर्थ जग कुठे चाललं आणि कसं चाललंय या संबंधिचा अनुभव आपल्याला बघायला मिळत आहे”, असं पवार म्हणाले.

“वेळ आलेली आहे. ती वेळ या चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज व्यासपीठावर काही लोकं आहेत. त्यांना काही कारण सांगून महिनोंमहिने तुरुंगात टाकलं. आज सत्तेचा गैरवापर कुणी वेगळं राजकारण करत असेल, ठिक आहे तुम्ही राजकारण करत आहात, पण असं राजकारण करणाऱ्यांना उलथून टाकायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे”, असं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.