‘संकटमोचक’च संकटात? जळगावात भाजपला मोठा झटका, बड्या नेत्याचा राजीनामा, शरद पवार गटाच्या वाटेवर

| Updated on: Sep 16, 2024 | 8:16 PM

जळगावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे नेते दिलीप खोपडे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

संकटमोचकच संकटात? जळगावात भाजपला मोठा झटका, बड्या नेत्याचा राजीनामा, शरद पवार गटाच्या वाटेवर
गिरीश महाजन
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल कधीही वाजू शकतं. त्याआधी भाजपला जळगावात मोठा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन यांना मोठा झटका बसला आहे. कारण जळगावातील भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खोपडे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिलीप खोपडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. खोपडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जामनेरमध्ये तयारीला लागले आहेत. ते आगामी निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी लढवणार आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहणार आहे. गिरीश महाजन हे राज्यात सध्याच्या घडीला भाजपचे नंबर दोनचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं. पण त्यांच्याच मतदारसंघात दिलीप खोपडे यांच्या बंडाच्या निमित्ताने भाजपात धुसफूस असल्याची माहिती समोर आली. आता या राजकीय घडामोडींवर गिरीश महाजन काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दिलीप खोपडे काय म्हणाले?

“विधानसभेचा आमदारकीच फॉर्म घेतल्यापासून मला त्यामध्ये सहभागी केले जात नाही. हे मला खटकायला लागलं आहे. मी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क केलेला आहे, चर्चा केली आहे. मी सांगितलं आहे की, भाजपकडूनच एक उमेदवार आणतो. त्यांना मी कनविन्स करतोय. त्यांना संधी द्या. त्यांनी संधी देण्याचं कबूल केलं आहे. म्हणूनच ते माझ्यापर्यंत आले. मी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी लढवणार आहे”, अशी प्रतिक्रिया दिलीप खोपडे यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात याआधी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल, असा मविआ नेत्यांचा दावा आहे. दुसरीकडे महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 3 हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे ही योजना महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.