स्पेशल रिपोर्ट : दिल्लीतून हालचाली, उद्या फडणवीसांवर फैसला?

| Updated on: Jun 17, 2024 | 10:43 PM

काही दिवसांआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावरुन आता, दिल्लीतून हालचाली सुरु झाल्या आहेत. 2 केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी आणि सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, दिल्लीत उद्या बैठक आहे.

स्पेशल रिपोर्ट : दिल्लीतून हालचाली, उद्या फडणवीसांवर फैसला?
देवेंद्र फडणवीस
Follow us on

लोकसभेचे निकाल लागताच, फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाच्या संघटनाची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता दिल्लीतून हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव या 2 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलीय. महाराष्ट्रात भाजपच्या पराभवावरुन दोन्ही केंद्रीय मंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे. दिल्लीत मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे नेते हजर राहणार आहेत. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोअर कमिटीत निर्णय होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष आहे. फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाबाहेर राहण्याच्या इच्छेवर ठाम असल्याची माहिती आहे.

2 केंद्रीय मंत्र्यांच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विनोद तावडेंकडे बोट दाखवलंय. तावडेंकडून डावपेचाचं राजकारण सुरु असून फडणवीसांना बाजूला करण्याचा डाव, असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजप 23 वरुन 9 खासदारांवर आलीय. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी, फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

फडणवीसांनी राजीनामा दिला तर नवा गृहमंत्री कोण?

अर्थात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिलीच तर नवा उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल. फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर नवा गृहमंत्री कोण असेल? हेही भाजपला निश्चित करावं लागेल.

देवेंद्र फडणवीसांना संघटनेचं मोठं, प्रदेशाध्यक्षपद दिल्यास चंद्रशेखर बावनकुळेंना पदमुक्त व्हावं लागेल. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदावरुन पदमुक्त झालेच, तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का? याचाही निर्णय होईल. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. त्याआधी फडणवीसांवरुन नेमकं काय करायचं, याचा फैसला भाजपच्या नेतृत्वाला करावा लागेल.