मोठी बातमी! अमित शाहांना वेगळीच चिंता, महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?

| Updated on: Oct 24, 2024 | 3:22 PM

राज्यात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. आज दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मोठी बातमी! अमित शाहांना वेगळीच चिंता, महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?
Follow us on

राज्यात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही राज्यात काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत. ज्या मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. त्या मतदारसंघावर महायुतीमधील एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला आहे. या मतदारसंघात उमेदवार ठरत  नसल्यामुळे आता हा तिढा दिल्लीच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे.

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढ, राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवाव, अशा सूचना राज्यातील नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत .

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी महायुतीचा एकच जाहीरनामा असणार आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळा जाहीरनामा सादर करणार नाहीत. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित जाहीरनामा पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र प्रचार करणार नसून एकत्रच प्रचार करणार आहेत.