‘मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत’, ड्रग्ज प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा?

| Updated on: Jun 23, 2024 | 6:04 PM

"पुणे शहरात काय की मुंबई शहरात काय, कुठेही असलं तरी ड्रग्ज हे फार भयानक गोष्ट आहे. मी पुण्याचा पालकमंत्री असताना, सर्व पोलिसांची बैठक घेऊन म्हटलं होतं की, बाकी गोष्टी सुद्धा होताच कामा नये. क्राईम होताच कामा नये. पण हा क्राईम जो आहे, प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछेडा, यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते द्यायला तयार आहे", अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत, ड्रग्ज प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा?
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
Follow us on

पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी सोडवर असणाऱ्या एका नामांकीत हॉटेलमध्ये मध्यरात्री अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारावरुन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शु्ल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांवर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे पुण्याचे विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. पण अजित पवार यांना टोला लगावल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी नंतर आपली बाजू सावरण्याचा देखील प्रयत्न केला.

“मी पालकमंत्री असताना कधी या प्रकारच्या नाही, पण ज्याबद्दल सर्वजण चिंता करतील, अशा घटना घडल्याच नाहीत. घडल्या आहेत का ते आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाही”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला. पण आपली चूक लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी बाजू सावरण्याचादेखील प्रयत्न केला. “अशा घटना घडल्या नाहीत असा दावा करता येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी 14 लाख होती ती आता 70 लाख झाली. वेगवेगळ्या सोयी-सुविधा, रोजगार या गोष्टींमुळे ही गर्दी वाढली आहे. त्यामुळे या घटना घडू नयेत यासाठीपोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे. पण अशा सगळ्याच घटनांना मंत्री जबाबदार आहेत, असं म्हणणं योग्य नाही. त्या मंत्र्यांची इनव्हॉलमेंट आहे, असं सिद्ध झाल्यास तसं बोलायला हरकत नाही. पण तसं नसताना आरोप करणे बरोबर नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘आरोप करणे चुकीचे’

“लोकशाहीमध्ये काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विरोधकांनी काय बोलायचं हा माझा विषय नाही. आपल्या देशातील लोकशाही, आपला समाज हे इतके जागृत आहेत की, असं काही आढळलं तर त्याच्यावरही कारवाई होईल. एखाद्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातला साडेबारा कोटी महाराष्ट्राचा मंत्री असतो. त्यातून अशाप्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इनव्हॉलमेंट लक्षात न येता आरोप करणं चुकीचं आहे. पण लोकशाहीमध्ये आरोप करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. आरोप केले आहेत तर तशाप्रकारचे पुरावे द्या. घटना घडली आहे तर मंत्रींना टार्गेट केलं जातं. पण त्या खात्याचे मंत्री असले म्हणजे त्यांची डायरेक्ट इनव्हॉलमेंट नसते. त्यामुळे आरोप करणाऱ्याला आरोप करण्याचं स्वातंत्र आहे. त्याची योग्यप्रकारे चौकशी होईल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘मुरलीधर मोहोळ पोलीस आयुक्तांना भेटले आणि…’

“मध्यंतरी देशाचे राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या नेृत्वातील शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांना भेटले. घटना ज्या-ज्या घडत आहेत त्यांची चौकशी करा आणि कारवाई करा. पण अशा घटना घडू नयेत म्हणून नियमावली तयार करा. त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करु. सोलापुरात कोणतीही दुकान रात्री दहा वाजेनंतर उघडं राहू शकत नाही. त्यामुळे सोलापुरात किराना मालाचं दुकानही रात्री दहा वाजेनंतर उघड राहत नाही. त्यामुळे भाजपने पुण्यात अशाप्रकारची नियामावली तयार करण्यासाठी निवेदन दिलं आहे”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांचं ड्रग्जबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया

“पुणे शहरात काय की मुंबई शहरात काय, कुठेही असलं तरी ड्रग्ज हे फार भयानक गोष्ट आहे. मी पुण्याचा पालकमंत्री असताना, सर्व पोलिसांची बैठक घेऊन म्हटलं होतं की, बाकी गोष्टी सुद्धा होताच कामा नये. क्राईम होताच कामा नये. पण हा क्राईम जो आहे, प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछेडा, यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते द्यायला तयार आहे. सगळ्या प्रकारची अडव्हान्स इन्स्ट्रूमेंट खरेदी करा. जसं दामिनी पथक आपण सुरु केलं. मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, विश्वास नांगरे पाटील आयजी असताना त्यांनी प्रस्ताव मांडला की, आपण दामिनी पथक सुरु केलं पाहिजे. मी मोठ्या प्रमाणात नियोजनासाठी टू व्हिलरट आणि फोर व्हिलर दिल्या. मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने महिला पोलीस, कारण मुलींशी संबंधित विषय असतो, कोल्हापुरातले कॉलेज, बसस्टॉपवर एक भयंकर दहशत निर्माण केली. मी पालकमंत्री असताना सांगितलं की, ड्रग्जचं क्राईम करु नका. कारण ही कीड कधी तुमच्या घरी येईल ते समजणार नाही. हा खूप मोठा सीरियस विषय आहे. मोठमोठे देश, मोठमोठे राज्य यामुळे रसातळाला गेले आहेत”, अशी महत्त्वाती प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.