चक्क नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण…

| Updated on: Jul 26, 2024 | 7:25 PM

भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणादेखील साधला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

चक्क नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण...
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणादेखील साधला. “उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. देव तुम्हाला चांगलं बोलण्याची बुद्धी देवो. भावीला काही अर्थ नाही, भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे”, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.

“उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं पाहिजे. मोदींनी महाराष्ट्राची लूट केली, दिल्लीचे बुट चाटणारे सरकार असं ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बजेटमध्ये काय दिवे लावले याची माहिती माझ्याकडे आहे. 4.5 लाख कोटींचा बजेट आहे. ठाकरेंना बजेट कळतच नाही. 2020-21 ला 71 हजार कोटींची वित्तीय तुट आहे. उद्धव ठाकरेंनी बजेटवर बोलू नये. आमचा अर्थसंकल्प सर्वकष आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

ठाकरेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचा दावा उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. “देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र नाही म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानगर दिसत नाही म्हणतील. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या योजना किती? भारताला 10 वरून 5 व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेत आणलं”, असं प्रत्युत्तर नारायण राणे यांनी ठाकरेंना दिलं.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राणे म्हणाले…

यावेळी नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “राज ठाकरे निवडणूक लढत आहे. ते बोलत आहेत की, 200 पेक्षा जास्त जागा असतील. ते त्यांचे हे जागांचे आकडे निवडणूक जाहीर होण्यापर्यंत सांगतील. पण नंतर सर्व बदल होईल. जागांचे आकडे वाढतील किंवा कमी होतील, नाहीतर अॅडजस्टमेंट होईल, बराच काही बदल होऊ शकतो”, असं नारायण राणे म्हणाले.