पडद्यामागे जोरदार हालचाली, नांदेडमध्ये मोठं काहीतरी घडतंय?

| Updated on: Jun 10, 2024 | 4:07 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले नाही. या निवडणुकीत भाजपची मोठी हानी झाली. भाजपचे मातब्बर आणि दिग्गज नेत्यांचा लोकसभेत पराभव झाला. यानंतर आता भाजपमध्ये पराभवाची कारणे शोधली जात आहेत. प्रत्येक मतदारसंघात नेमकं चुकलं कुठे? याबाबत चिंतन केलं जात आहे. नांदेडमध्ये तसंच काहीसं घडलं आहे. तर बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनीदेखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.

पडद्यामागे जोरदार हालचाली, नांदेडमध्ये मोठं काहीतरी घडतंय?
प्रतापराव पाटील चिखलीकर
Follow us on

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला आहे. हा पराभव भाजपाच्या कार्यकर्त्यांना चांगला जिव्हारी लागला आहे. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आज चिंतन बैठक पार पडली. यावेळी पराभवाची कारणेमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बैठकीत पक्षांतर्गत झालेल्या चुकांचा उहापोह करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख बदलण्यात यावे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी बदलण्यात यावी, असे मत मांडण्यात आले.

नांदेड भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम केलं नाही, असा ठपकाही ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोप-प्रत्यारोपाने बैठक चांगली चर्चेत आली. त्यानंतर आता उद्या पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभा मतदारसंघाचा आभार दौरा सुरू करणार आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवावर आमदाराची प्रतिक्रिया

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीडमधील पराभवावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये दुर्दैवाने आम्ही कमी मतांनी हरलो आहोत. नवीन भिडू आमच्याबरोबर आला हे सामान्य लोकांना रूचलं नाही”, असा टोला सुरेश धस यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला. “लोकांशी संवाद करण्यास आम्ही कमी पडलो. लोकांच्या मनात प्रचंड राग होता. लोकांनी बोलून दाखवलं नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम मतदानावर मोठ्या प्रमाणे झाला. अबकी बार चारशे पार हा नारा कामी आला नाही. संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला. विकास सांगत बसण्यापेक्षा शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत क्लेरिफिकेशन झाले पाहिजे. सगेसोयरे संदर्भातला निर्णय शासनाने स्पष्ट करावा. आरक्षणाबरोबरच कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध दराबद्दल असलेली नाराजी आमच्या अंगलट आलेली आहे”, असं सुरेश धस म्हणाले.

“बीड जिल्ह्यातील काही आमदारांनी मतांच्या बाबतीत मालक असल्याचे भासविले. कोणी कोणत्या मतदारसंघात काय केलं? कोणत्या आमदाराने स्टेजवरच त्यांच्यात्यांच्या पक्षाचा प्रचार केला, याची शहानिशा झाली पाहिजे. बीड जिल्ह्याचे राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे. परळीत 74 हजाराची लीड दिली. इतरांच्या बद्दल मला बोलायचं नाही. कोणी कसं काम केलं? याची शहानिशा झाली पाहिजे. बीड आणि गेवराई मतदारसंघात आम्ही कमी पडलो आहोत. पुढच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल तर या लोकसभा निवडणुकीत काय झाले याची शहानिशा करावी लागेल”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.