महिन्याभराच्या तारखा बूक, आता पुढचा प्रवेश कोणाचा? शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

| Updated on: Oct 07, 2024 | 9:01 PM

शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यानंतर आता भाजपला धक्का दिला आहे. आणखी महिनाभराच्या तारखा बुक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुणाला धक्का बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महिन्याभराच्या तारखा बूक, आता पुढचा प्रवेश कोणाचा? शरद पवारांचा अजित पवारांना इशारा
Follow us on

हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होताच, शरद पवारांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे. आता पुढचा प्रवेश फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचा असेल असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. 14 तारखेला फलटणला जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.. इतकंच नाही तर पुढच्या महिन्याभराचा तारखा बूक असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.म्हणजेच, शरद पवारांचा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकरांकडे आहे.

2 दिवसांपूर्वीच फलटणच्या मेळाव्यात निंबाळकरांनी तुतारी हाती घ्यायची का ? असा सवाल समर्थकांना केला होता आणि पक्षश्रेष्ठींना भेटून योग्य निर्णय घेणार असल्याचं निंबाळकर म्हणाले होते. आता ते मुंबईत अजित पवारांना भेटणार आहेत. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांत कागलमधून समरजित घाटगे, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांच्या रुपात भाजपला धक्का दिला. आता फलटणमध्ये रामराजेंच्या रुपात शरद पवार दादांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. तर शरद पवारांना 40 जागा भरायच्या आहेत, त्यामुळं ते इकडून तिकडून लोक घेत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

रामराजे निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे आहेत. शरद पवार यांनी 14 तारीख सांगून, सूचक इशारा दिलाच आहे. फक्त 14 तारीखच नाही तर महिन्याभराच्या तारखा बूक असल्याचं सांगून शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये धडकी भरवण्याचा प्रयत्न केला आहे.

महायुतीचे अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्यांच पक्षांकडून तयारी सुरु आहे. जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. राज्यात कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे विलंब होऊ नये म्हणून मुलाखती घेणं सुरु झालंय. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. याबाबत शरद पवार आघाडीवर आहेत. जागा वाटपात शरद पवार गटाला जितक्या जागा येतील त्या जागांवर उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरु आहे.

महायुतीत ज्यांना तिकीट मिळणार नाही असे ज्यांना संकेत मिळाले आहेत ते विरोधी पक्षात जाऊन तिकीट घेण्याच्य प्रयत्नात आहेत. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात कोण कुठे जातं याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे.