महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील नेहमी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहे. आता त्यांना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला आहे. ‘मनोजदादा जरांगे, आमचं चुकलं काय ? खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणा…’, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज दादा जरांगे, आमचे चुकले काय ? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं हे चुकलं का? त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण गेले, त्यात आमचे काही चुकलं का ? पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या काळात आम्ही मराठा दिले हे आमचं चुकलं का? असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना विचारला आहे.
मनोज जरांगे जर आम्हाला समजून घेत नसतील तर सामान्य मराठा समजून घेईल, असा सूचक इशारा त्यांनी मनोज जरांगे यांना दिला. जो लोकसभेला फटका मराठवाड्यात बसला तो विधानसभेला बसणार नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, माझी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे, मराठा आरक्षणसाठी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे.
वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीने हे वक्तव्य करणे हा त्या व्यक्तीचा दोष असू शकतो. आमच्या पक्षाची ही संस्कृती नाही. संगमनेर येथे महिलेवर झालेल्या आरोपाबाबत त्यांनी वसंत देशमुख यांना सुनावले. या प्रकरणात सुजय विखे यांनाही समजण्यात आले आहे. आपल्या बोलण्यात सर्वांनीच एकमेकांचा आदर व्यक्त केला पाहिजे, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.