मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या टीव्ही ९ च्या कार्यक्रमात बोलताना अनेक मुद्द्यांवर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी झालेल्या चुकांसाठी माफीही मागितली. ते म्हणाले की, ‘शिवरायांच्या चरणावर हजार वेळा माथा ठेवला तरी कमी आहे. कार्यकर्त्यांना समजू शकतो. पण मोठे नेते जोडो मारो आंदोलन करत होते, ही आपली संस्कृती नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. राजकारण करा पण ते करताना कोणत्या थराला जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरेंना मीच स्वप्नात दिसत असेल. हा रडणारा नाही हा लढणारा एकनाथ शिंदे आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहे.’
‘मी म्हणालो होतो की, पुतळा ज्यांनी बनवला तेव्हा तेथील वस्तू स्थिती लक्षात घ्यायला पाहिजे होती. आता लोकांना तसं सांगितले आहे. आता ५०० वर्ष पुतळा हलणार नाही असं काम करुन दाखवू. कुणाला दाखवण्यासाठी आम्ही माफी मागितली नाही. आमच्या वेदना होत्या.’
‘ज्यांना आरक्षण दिलं पाहिजे होते त्यांनी दिले नाही. जेव्हा संधी होती तेव्हा दिले नाही, आता कोर्टात हेच लोकं गेले नाहीत. कोणताही निर्णय घेताना कायद्यानुसार तो टिकला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना आरक्षण दिलं होतं. नंतरचं सरकार ते सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत.’
‘ओबीसीला धक्का न लावता १० टक्के आरक्षण आम्ही दिले आहे. हे कोर्टात टिकवण्याचं काम करत आहे. पण याला कोर्टात विरोध कोण करतंय हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिले पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. सगेसोयरेच्या बाबतीत जे आक्षेप आले त्यावर काम सुरु आहे. लोकांना माहित आहे हा पक्ष न्याय देईल.’
‘होणार नाही हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. अशक्य गोष्टी काही नाही. व्हिजन पाहिजे. आम्ही सरकार म्हणून काम केले आहे. आम्ही सकारात्मक काम करत आहोत.’ असं ही शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.