एकाच दिवसांत महाराष्ट्रात 3 ठिकाणी राडे, पाहा कुठे काय काय घडलं

| Updated on: Oct 07, 2024 | 9:48 PM

महाराष्ट्रात आज एकाच दिवसात तीन ठिकाणी मोठे राडे झाले आहेत. कुठे श्रेयवादावरुन वाद झाला आहे तर कुठे किरकोळ कारणावरुन वाद झाला. कुठे दुचाकीला रिक्षाने ठोकलं म्हणून वाद झाला.

एकाच दिवसांत महाराष्ट्रात 3 ठिकाणी राडे, पाहा कुठे काय काय घडलं
Follow us on

एकाच दिवसांत महाराष्ट्रात 3 ठिकाणी राडे झाले आहेत. अकोल्यात 2 गटात वाद झाला. सांगलीत रिंग रोडच्या श्रेयवादावरुन भाजप आणि खासदार विशाल पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर जालन्यात तिकीटावरुन कैलाश गोरंट्य़ाल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. अकोल्यात 2 गटात राडा झाला. हरिहर पेठमध्ये रिक्षा चालकानं एका बाईकला धडक दिली आणि त्यानंतरच्या राड्यात दुचाकी आणि रिक्षांची जाळपोळ झाली. सांगलीत रिंग रोडच्या श्रेयवादावरुन भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटलांमध्ये स्टेजवरच चकमक झाली. जालन्यात तिकीटसाठी काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल आणि इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला.

अकोल्यात रिक्षा चालकाची बाईकला धडक बसल्यानं बाचाबाची सुरु झाली. बाचाबाचीनंतर 2 गट आमनेसामने आले, आणि एका गटानं दगडफेक केली दगडफेकीनंतर 3 दुचाकी जाळण्यात आल्या त्यानंतर हरिहर पेठमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सांगलीत, आजी माजी खासदारच समोरासमोर आले. निमित्त तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचं होतं…मात्र रिंगरोडच्या श्रेयवादावरुन सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटलांमध्ये स्टेजवरच शाब्दिक चकमक झाली. भर कार्यक्रमात स्टेजपर्यंत दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. चमकोगिरी राजकारणातली हा धंदा बंद कर, असं संजय काका, खासदार विशाल पाटलांना म्हणाले. खासदार विशाल पाटलांनी, तासगाव रिंगरोडच्या कामाला मंजुरी मिळवण्याचं श्रेय, आमदार रोहित पाटलांना दिलं आणि इथूनच ठिणगी पडली.

जालन्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा झाला. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच आमदार कैलाश गोरंट्य़ाल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समथर्कांमध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर दोघांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे सगळेच पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. अनेकांनी कामाचं श्रेय घेण्यासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. निवडणुकीत इच्छूक उमेदवार देखील जोरदार प्रचार करत आहेत. पण यावरुन राडा ही होतो. त्यामुळे आगामी काळात असे आणखी राडे पाहायला मिळू शकतात.