‘एका लढ्याला यश’, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 03, 2024 | 9:20 PM

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात सर्वसामान्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

एका लढ्याला यश, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णायमुळे मराठी भाषेचं साहित्य, कला जगभरात पोहोचण्यासाठी जास्त मदत होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गेल्या 60 वर्षांपासूनची मागणी होती. अखेर ही मागणी मान्य झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!”, असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

“अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.