विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवरांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत पक्षाच्या 13 आणि मित्रपक्षाच्या 2 अशा एकूण 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकूण उमेदवारांची संख्या ही 80 इतकी झाली आहे. यामध्ये 2 मित्रपक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना आज कन्नडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी हवी होती. पण या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा अखेर करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्या तिकीटाची आशा आता मावळली आहे. संगमनेरमध्ये शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिरोळमधून रांजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नेवाशातून विठ्ठलराव लंघेंना तिकीट जाहीर झाला आगहे. हा मतदारसंघ भाजपचा होता. पण शिंदे गटाने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्याचं चित्र आहे. भांडूपमधून अशोक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माजी आरोग्य मंत्री तथा शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात घनसावंगीतून हिमकत उढाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपकडून आज आधी 25 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या एकूण उमेदवारांची संख्या ही 146 वर पोहोचली. त्यानंतर भाजपने 4 जागांसाठी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे. भाजपने बडनेरामध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर गंगाखेड येथे रासप, कलिना मतदारसंघात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष आणि शाहुवाडी येथे जन सुराज्य शक्ती पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मित्रपक्ष पकडून आता भाजपच्या 150 जागा झाल्या आहेत.