महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर कोण मुख्यमंत्री होईल? नाना पटोले स्पष्टच म्हणाले….

| Updated on: Oct 28, 2024 | 6:59 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'टीव्ही9 सत्ता संमेलन' कार्यक्रमात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. "काँग्रेसला संधी मिळाली तर हायकमांड मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील", असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर कोण मुख्यमंत्री होईल? नाना पटोले स्पष्टच म्हणाले....
नाना पटोले
Follow us on

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत कोण जिंकेल आणि कुणाचा पराभव होईल ते 23 नोव्हेंबरच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यासह नाना पटोले यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली. ते ‘टीव्ही9 सत्ता संमेलन’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी जागावाटपाचा प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “आता सर्व सेट झालं आहे. हे चालत राहतं. आमच्याकडेच नाही. भाजपमध्येही सुरूच होतं. उद्या शेवटची तारीख आहे. उद्या दुपारपर्यंत अलायन्स क्लिअर होईल”, असं नाना पटोले म्हणाले.

“काँग्रेसबाबत अफवा भाजप पसरवत असते. आम्ही भाजपला सीरिअसली घेत नाही. जनतेलाही माहीत आहे. महाराष्ट्र वाचवायचं आमचं काम आहे. त्यामुळे शिवसेनेला विदर्भात जास्त जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज झाले असं म्हणणं चुकीचं आहे”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं. “राहुल गांधींना वाटायचं की सर्व समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे. सर्वांना संधी दिली पाहिजे. राहुल गांधी यांनी ही भूमिका ठेवली होती. पण आघाडीच्या राजकारणात मेरिटवरच जागा वाटप करावं लागतं. त्यामुळे काही समाजाला संधी देता आली नाही. पण सत्तेत आल्यावर आम्ही या समाजाला मुख्य प्रवाहात आणणार आहोत”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“नाना कधी घाबरत नाही. अधिकाराची गोष्ट ठाकरे गट ठेवतो. आमच्या अधिकारावर आम्ही बोलत असतो. लोकशाहीत हा अधिकार आहे. संजय राऊत आमचे मित्र आहे. आव्हान वगैरे नाही. उद्यापर्यंत सर्व गोष्टी नीट होतील. अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत तेही मुख्य प्रवाहात येतील. आमच्या जागा वाटप झाल्यावर त्यांना जागा देण्याचं ठरलं होतं. पण आम्हालाच वेळ लागला. त्यामुळे छोटे पक्ष नाराज झाले. पण उद्यापर्यंत सर्व क्लिअर होईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल?

“काँग्रेसकडून महाविकास आघाडीच हा आमचा चेहरा राहील असं आम्ही स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही काही लपून ठेवलं नाही. आम्ही तिन्ही मिळून लढणार आहोत. आमची लढाई खुर्चीसाठी नाही. आमची लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे. बहुमतात सरकार आणणं हा आमचा पहिला मुद्दा आहे. महायुतीत जे काही चाललंय ते पाहा. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं आता तुमची संधी गेली, असं अमित शाह बोलले. युतीत काय चाललंय पाहा. पण आमच्यामध्ये सर्व क्लिअॅरिटी आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी महायुतीला टोला लगावला.

“काँग्रेसला संधी मिळाली तर हायकमांड मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. मी जे काही आहे ते तोंडावर बोलतो. जे आहे त्याचा रिझल्ट देतो. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सत्ता आहे, महाराष्ट्र विकला जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग विकले जात आहेत. खुर्ची ही माझी चिंता नाही. महाराष्ट्र वाचवणं ही माझी चिंता आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे. आम्ही राज्यात कधी तणाव पाहिला नाही. पण भाजपची सत्ता आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र शांतता प्रिय राज्य आहे. भाजपने महाराष्ट्राला बरबाद करण्याचं काम केलं आहे. आम्ही ते कधी होऊ देणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

“महाराष्ट्र वाचवणं हे आमचं काम आहे. आम्ही पक्ष वाढवला. ज्या खुर्चीवर आम्ही बसलो त्या खुर्चीत जीव ओतणं आमचं काम आहे. खुर्ची जनतेची असते. लोकांचं काम करणं हे आमचं काम आहे”, असं नाना पटोले म्हणाले. “लोकसभेची निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढण्यात आली होती. आता खरी सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांची सुरुवात झाली आहे. तसेच भाजप संविधानाच्या विरोधात बोलत असते. भाजप लोकशाहीला धोका आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.