काँग्रेसची नांदेडमध्ये सर्वात मोठी कारवाई, नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

| Updated on: Sep 30, 2024 | 6:04 PM

काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने नांदेडमध्ये नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत संबंधित नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसची नांदेडमध्ये सर्वात मोठी कारवाई, नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्यांना थेट आता घरचा रस्ता दाखवला जात आहे. नांदेडमध्ये त्याचाच प्रत्यय बघायला मिळत आहे. काँग्रेसने नांदेडमध्ये नगरराध्यक्षांसह तब्बल 9 नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे. भाजपचं काम करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्याकडून ही हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप नेत अशोक चव्हाण यांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, असं असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी म्हटलं आहे.

जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम काय म्हणाले?

“काँग्रेसचे 10 नगरसेवक जिंकून आले होते. त्यामध्ये एक नगराध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि एक सभागृह नेता होता. या लोकांनी मागे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात काम केलं. भाजपचं काम केलं. आम्ही त्यांना सूचनापत्र दिलं की, असं करु नका. पण ते ऐकत नव्हते. त्यामुळे पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची मागणी होती की, त्यांना पक्षातून काढून टाका. त्यानुसार आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे याबाबतची तक्रार केली”, असं बी. आर. कदम यांनी सांगितलं.

“आमच्या हायकमांडने संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मला परवानगी दिली. मला अधिकार दिले. त्या अधिकाऱ्यांचा वापर करुनन मी आज एक नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभागृह नेता यांच्यासह इतर 7 नगरसेवकांना पक्षातून काढून टाकलं. जनतेची इच्छआ होती की, त्यांना पक्षातून कमी करावं. ते अनेकदा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. ते काँग्रेसमुळे मोठे झाले आणि काँग्रेसच्या विरोधात कारवाई करत होते. त्यामुळे त्यांना काढून टाकलं”, अशी प्रतिक्रिया बी. आर. कदम यांनी दिली.