MPSC आणि स्पर्धा परीक्षांबाबतचे सरकारचे मोठे निर्णय; शिंदे, फडणवीस यांच्या घोषणा काय?

| Updated on: Jul 01, 2024 | 3:16 PM

महाराष्ट्रात नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारने 75 हजार नवीन पद भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने अडीच वर्षाच्या काळात 1 लाख 8 हजार नोकऱ्या दिलेल्या आहेत.

MPSC आणि स्पर्धा परीक्षांबाबतचे सरकारचे मोठे निर्णय; शिंदे, फडणवीस यांच्या घोषणा काय?
MPSC आणि स्पर्धा परीक्षांबाबतचे सरकारचे मोठे निर्णय
Follow us on

Maharashtra Government MPSC Exam : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी नीट (NEET) ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. मात्र यंदा या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला. नीट परीक्षेत तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. त्यातच आता महाराष्ट्रात MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी नवीन कायदा

“स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून नवीन कायदा केला जाणार आहे. मुख्यमंत्र्‍यांनी याबद्दलचे निर्देश दिले आहेत. याच अधिवेशनात आम्ही हा कायदा मांडणार आहोत. यामुळे यापुढे सर्व परीक्षांच्या प्रक्रिया या पारदर्शी पद्धतीने होतील”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

वर्ग क ची पदही MPSC कडे दिली जाणार

“तसेच वर्ग क ची पदही MPSC द्वारे भरली गेली पाहिजेत, अशी मागणीही केली जात होती. गेल्या कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार टप्प्याटप्प्याने वर्ग क ची पदही MPSC वर्ग करण्यात येणार आहेत. त्यानुसार ही सर्व पद एमपीएससीद्वारे भरण्यात येतील”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत 1 लाख 8 हजार पदांची भरती

“महाराष्ट्रात नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारने 75 हजार नवीन पद भरण्याची घोषणा आमच्या मुख्यमंत्र्‍यांनी केली होती. ही भरती आम्ही सुरु केली. याबद्दल परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने या परीक्षा पार पडल्या. अमरावतीत घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला आणि तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शासनाने एक अतिशय चांगला रेकॉर्ड तयार केला आहे.

आतापर्यंत ऑगस्ट 2022 नंतर 57452 तरुणांना आम्ही नियुक्तीपत्र दिले आहे. या व्यतिरिक्त ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना या सव्वा महिन्यात किंवा महिन्याभरात ज्यांना नियुक्तीपत्र दिले जाईल, अशी संख्या 19853 इतकी आहे. म्हणजे आम्ही 75 हजार भरतीची घोषणा केली होती, त्याऐवजी आम्ही 77 हजार 305 लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचे सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहे. तर काहींना दिले जात आहे.

यासोबतच आता जे अंतिम स्टेजला आहे, अशी पद 31 हजार 201 पद आहेत. ज्याची प्रक्रिया येत्या 3 महिन्यात पूर्ण करणार आहोत, म्हणजे जवळपास 1 लाख 8 हजार नोकऱ्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील तरुणाईला दोन वर्षाच्या काळात एक लाख नवीन नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केला आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्ग क मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश?

MPSC परीक्षांमध्ये उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक या पाच पदांचा समावेश होतो. MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठीची कौशल्य चाचणी परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा पवईतील ion digital zone या ठिकाणी होणार होती. मात्र 1 जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ही परीक्षा TCS कडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.