मी स्वत:हून भाजपमध्ये प्रवेशासाठी विनंती केली नव्हती. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानंतर मी भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली. परंतु त्यानंतर राज्यातील भाजप नेते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या भाजप प्रवेशाला विरोध झाला. त्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला. आता राज्यातील नेते मोठे आहेत की राष्ट्रीय नेते नड्डाजी मोठे आहेत? हा प्रश्न मलाही पडला आहे. नड्डाजींची पॉवर कमी झाली आहे का? असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. आता आपण राष्ट्रवादीत असून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार एकनाथ खडसे यांनी प्रथमच उघडपणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, फडणवीस आणि महाजन या दोन नेत्यांनी मला उघड विरोध केला नाही. परंतु आतून विरोध केला. त्यांच्या दबाबामुळेच मला भाजपचे लोक भेटण्यास घाबरतात. त्याच्यासह अनेक नेते माझ्या नेतृत्वाखालीच घडले.
मी ४० वर्षे भाजपमध्ये होतो. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाची सर्व सूत्रे माझ्याकडे होती. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्या ठिकाणी त्या भागातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणून त्यावेळी पक्ष मजबूत केले. त्यामुळे तेव्हा आमचे १२३ आमदार निवडून आले. त्यावेळी शिवसेनासोबत युती नव्हती. परंतु त्यानंतर त्यानंतर २०१९ मध्ये भाजप शिवसेनेसोबत युती होती. केंद्रात सरकार होते. त्यानंतर भाजपच्या १०५ जागा आल्या, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
मी भाजपचा विषय सोडून दिला आहे. मी राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादीत राहणार आहे. महाराष्ट्रातील दोन नेत्यांनी विरोध केला. जे.पी.नड्डांवर दबाब टाकणारे नेते कोण? असे विचारले असता खडसे यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांची नावे घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपची परिस्थिती नाजूक होती. सर्व्हेच्या माध्यमातून ते समोर आले होते. त्यामुळे मला भाजप प्रवेश देण्यात येणार होतो. रक्षा खडसे उभ्या होत्या, त्यांना मदती करण्याचे मला सांगितले. त्यानंतर त्यांना मदत केली, परंतु त्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असे खडसे म्हणाले.