राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजूनही निश्चित झालेले नाही. दुसरीकडे मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मनौधर्य उंचावले आहे. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. आमचा ८० टक्के पेपर सोडवला आहे. २० टक्के पेपरही लवकरच सोडवणार आहोत. तो सोडवला गेला की त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल.
काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेण्याची संधी पाहत होते. भाजपचा पराभव हरियाणात झाल्यावर शस्त्र चालवण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही. आता देशाचा मूड काय आहे, ते त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित असणारे ही तिन्ही पक्ष ”हम आपके हैं कौन” म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. आता विधानसभा निवडणुकीत हा फेक नॅरेटिव्ह ब्रेक झाला आहे. फेक नॅरेटीव्ह पूर्णपणे संपला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
आमचे सरकार असताना राज्यात आठ मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच मेडीकल कॉलेज विदर्भातील आहेत. त्या सर्व पाचही मेडीकल कॉलेजचे भूमीपूजन आज होत आहेत. यामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय जागा वाढणार आहेत. त्याचा फायदा राज्याला होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर विमानतळाचे आज भूमीपूजन होत आहे. नागपूरला देशातील आधुनिक विमानतळ होत आहे. त्यात कॉगो आणि प्रवाशी विमानतळ होत आहे. नागपूरसाठी १३ हजार कोटींची कामे करत आहोत.ओबीसीसाठी एकाच दिवशी ५२ हॉस्टेलचे उद्घघाटन करत आहोत. ज्या ठिकाणी हॉस्टेल झाले नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणाची व निवास भत्याची सुविधा देत आहोत.