शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय नव संकल्प शिबीर झाले. या शिबिरात राज्यभरातून पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आले होते. शिबिरातून पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. सुनील तटकरे म्हणाले, धनंजय बरे झाले तुम्ही आलात आणि बोललात. भुजबळ साहेब तुम्ही आलात. मोकळेपणाने बोललात. गेले काही दिवस तुमच्या विषयी ब्रेकिग न्यूज येत होत्या. गेल्या महिनाभरात तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलात ते मोकळेपणाने सांगितले. तुम्ही यापुढे अजित पवार यांच्या साथीने काम करत राहणार याची ग्वाही दिलीत याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो.
सुनील तटकरे पुढे धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले, धनंजय २०१४ ते १९ जसे काम केले. तसेच काम आता करावे लागणार आहे. आता तुमची सुटका नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेत काम केले. ती फेज आता गेली आहे. पुन्हा मागे जाऊन चालणार नाही. आता पुढे जायचे आहे. दोन दिवस शिर्डीच्या ऐतिहासिक नगरीत आपण दोन दिवस जे चिंतन मनन करत बसलो होतो. आज दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे जण अतिशय उत्सुकतेने याठिकाणी उपस्थित आहात.
पक्षातील घटनांचा आढावा घेताना तटकरे म्हणाले, एका टप्प्यावर आज राष्ट्रवादी पक्ष आहे. संघर्ष करावा लागत आहे. आता संघर्षाचे दिवस संपले आहेत. येत्या दोन- तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. कायम अवहेलना वाट्याला येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत ७२ % स्ट्राईक रेट मिलावला. दादा तुमचे राजकारण हे ग्रामीण भागाशी जोडलेले आहे. पण आपला पक्ष आता मुंबईसारख्या शहरात पोचला आहे. दादा आता तुमचा चेहऱ्या मुंबई सारख्या मोठ्या शहरातही पसंती मिळाली आहे. यापूर्वी आपण मुंबईमध्ये १५ जागांपुढे जाऊ शकलो नाही, हे सत्य आहे. पण आता तुमच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईत मोठा विजय मिळवू. दादा आपण जसे पुणे, पिंपरी चिंचवड भागाचा विकास केलात आणि इथला चेहरा झालात हेच आता मुंबईत करू, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
दादा प्रत्येक महापालिकेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून पक्षाची फळी बांधली तर पक्ष मजबूत होईल. दीर्घ काळ बाघितलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आजपासूनच कामाला लागा. कार्यकर्त्यामुळे आपण आज सत्तेवर बसलो आहेत. या कार्यकर्त्यांच्या मागे ताकत उभी करणार आहे. उमेदवारी कार्यकर्त्याला दिली पाहिजे याबाबत कोणाच्या मनात दुमत असण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि भगिनींना नक्की संधी दिली जाणार असल्याची ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली.