मल्लिकार्जुन खर्गे यांचा धुळ्यात येऊन अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यावर निशाणा, म्हणाले….

| Updated on: May 12, 2024 | 8:19 PM

"मोदींवर टीका केली तर लोक म्हणतात मोदींना खोटं ठरवतात. त्यांनी पहिल्या निवडणुकीवेळी सांगितलं होतं की सत्तेत आल्यास विविध देशात असलेला काळा पैसा परत आणू. हा काळा पैसा देशात आणून सर्वांना 15-15 लाख रुपये देणार, असं मोदी म्हटले होते. 15 लाख भेटले का?", असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा धुळ्यात येऊन अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यावर निशाणा, म्हणाले....
मल्लिकार्जुन खर्गे यांचा अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यावर निशाणा
Follow us on

काँग्रेसच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज काँग्रेसची धुळ्यात जाहीर सभा पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे स्वत: या सभेला उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात उमेदवार शोभा बच्छाव यांच्या नावाचा शोभा बच्चन असा उल्लेख केला. “ही निवडणूक माझी निवडणूक आहे. ही निवडणूक काही लहान-मोठी निवडणूक नाही. ही नगरपालिकेची किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, आमदारकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भविष्य बनवणारी निवडणूक आहे, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. देशाचं भविष्य बनवण्याचं, देशाची लोकशाही टिकवण्याचं आपलं काम आहे. लोकशाही जर या देशात राहिले नाही, संविधान राहिलं नाही, तर आपल्याला कोणीच विचारणार नाही”, असं मल्लिकार्जु खर्गे म्हणाले.

“मतदान हे सर्वात महत्त्वाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, संत ज्ञानेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक श्रेष्ठ माणसं या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले. या सर्वांनी जे मार्गदर्शन दिलं ते महत्त्वाचं आहे. तेच काम आपल्याला करायचं आहे. पण जर ते काम केलं नाही तर आपण पुढच्या पिढीला गुलामगिरीत ढकलू. आदिवासींचे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसांसारखे दिवस येतील. पुन्हा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केलं तर स्वातंत्र्यपूर्वीची गुलामीची स्थिती निर्माण होईल”, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलाय

“आपण यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे हे मत आपल्या स्वतःसाठी द्यायचं आहे. स्वातंत्र्य वाचलं तरच आपण जगू. तरच गरिबाचं राज्य राहील. नंदुरबारमध्ये इंदिरा गांधी आल्या तर संपूर्ण देश हलला. हा काँग्रेसचा गड आहे. संविधानाची सर्वात जास्त संरक्षण करायची गरज आहे. आपल्याला स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर सर्वांच्या फायद्यासाठी करायचं आहे”, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

‘मोदी निवडून आले तर ते संविधान बदलवतील’

“गेल्या 53 वर्षांपासून मी एकाच काँग्रेस पक्षात आहे. लोकशाहीची गोष्ट यासाठी करतो आहे की, एक मोठी संधी आपल्याला आहे, संविधान वाचवायची गरज आहे. भाजप, आरएसएसची लोकं सविधान संपवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. 2024 मध्ये मोदी निवडून आले तर ते संविधान बदलवतील. 2015 मध्येच त्यांनी हे सांगितलं होतं. मोदी नेहमी खोटे बोलतात. मोदींवर टीका केली तर लोक म्हणतात मोदींना खोटं ठरवतात. त्यांनी पहिल्या निवडणुकीवेळी सांगितलं होतं की सत्तेत आल्यास विविध देशात असलेला काळा पैसा परत आणू. हा काळा पैसा देशात आणून सर्वांना 15-15 लाख रुपये देणार, असं मोदी म्हटले होते. 15 लाख भेटले का?”, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

‘ईडीसीडीला घाबरून अशोक चव्हाण…’

“तुझे सरकार निवडून येत आहे. त्याला कसं काढायचं? याची त्यांच्याकडे चावी आहे. एक ईडी आहे, एक सीबीआय आहे आणि एक इन्कम टॅक्स आहे. या तीन चाव्या घेऊन ते फिरत आहेत. एक चावी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे असते दुसरी नरेंद्र मोदींकडे असते. ईडीसीडीला घाबरून अशोक चव्हाण आणि अजित पवार भाजपसोबत गेले. पळून जाणारे माणसं राज्यासाठी कशाला काम करतील? पळून जाणारे माणसं देशासाठी लढतील?”, असे खोचक सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.