अकोल्यात मोठा राडा, दोन गटात वाद, वाहनं जाळली, दगडफेक, नेमकं कारण काय?

| Updated on: Oct 07, 2024 | 6:16 PM

अकोल्यात दोन गटात मोठा राडा झालाय. विशेष म्हणजे किरकोळ भांडणाचं रुपांतर थेट दोन गटातील हाणामारीपर्यंत पोहोचलं. यावेळी रस्त्यावरील वाहनं जाळण्यात आली. तसेच दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक देखील झाली.

अकोल्यात मोठा राडा, दोन गटात वाद, वाहनं जाळली, दगडफेक, नेमकं कारण काय?
Follow us on

अकोल्यातून मोठी बातमी समोर येत आहे. अकोल्यात दोन गटात मोठा राडा झालाय. शहरातील हरिहर पेठमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यावेळी रिक्षा आणि दुचाकीदेखील जाळण्यात आल्या आहेत. तसेच दगडफेक देखील झाली आहे. विशेष म्हणजे अतिशय किरकोळ आणि शुल्लक कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित परिसरात निर्माण झाला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित परिसरात आहे. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. तसेच या घटनेत काही जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

संबंधित घटना ही आज दुपारच्या सुमारास घडली. हरिहर पेठमध्ये रिक्षा आणि बाईकची धडक झाली. या धडकेमुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. हे भांडण इतकं वाढलं की दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे घटनास्थळावरील अक्षरश: गाड्या जाळण्यात आल्या. दोन्ही बाजूने दगडफेक देखील झाली. या दगडफेकीत 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एक रिक्षा आणि तीन दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. यामुळे चारही वाहनं जळून खाक झाली आहेत.

या घटनेनंतर अकोला शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडली तेव्हा एक पत्रकार कव्हरेज करण्यासाठी आला तेव्हा त्याची देखील दुचाकी जाळून टाकण्यात आली. या घटनेनंतर सध्या परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील पोलिसांचं पथक तैनात आहे.

दरम्यान, छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन वाद घालणं आणि अगदी त्याचं रुपांतर जीवघेण्या राड्यापर्यंत होणं अशा घटना हल्ली वाढत आहेत. खरंतर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोणतंही कारण असलं किंवा कोणतीही समस्या असली तरी सामंजस्याने प्रश्न सोडवले जायला हवेत. अकोल्यात आज जी घडला घडली त्याने उलट नुकसानच होणार आहे. याशिवाय अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय ज्यांची काहीच चूक नाही अशा सर्वसामान्य नागरिकांना अशा घटनांच्या नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं.