महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर

| Updated on: Feb 06, 2024 | 8:03 PM

EC decision on NCP name and symbol | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर
Sharad Pawar and Ajit Pawar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.

शरद पवारांनी सुनावणीला स्वत: हजेरी लावूनही पक्ष हातून गेला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजेरी लावताना बघायला मिळाले. याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते. निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत. याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल? याबाबत उत्सुकता होती. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच निकाल दिला आहे.

अजित पवार यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेली याचिका

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं अडीच वर्षांचं सरकार पडलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह गेलं. निवडणूक आयोगात याप्रकरणी सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला होता. त्यानंतर वर्षभरात म्हणजे गेल्या वर्षी 2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून आला होता. कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारलं होतं.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगात याचिका देखील दाखल केली होती. त्यांच्या पाठोपाठ शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. लाखो प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूने निवडणूक आयोगात जमा करण्यात आले होते. अखेर या प्रकरणी मोठा ऐतिहासिक निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.