राज्यात अनेक ठिकाणी कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यातील गांवांचा सपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी देखील हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने हा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील शाळा, खाजगी अनुदानित, अशतः अनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळाना देखील उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या ही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील शाळेंना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारा नंतर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्वच माध्यमाच्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झाली आहे.
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज रोहा शहरातील दमखाडी येथे पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा मंत्री अदिती तटकरे यांनी घेतला. पूरग्रस्त भागाचे पंचनामे लवकरात लवकर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्याबाबतही प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यावेळी ग्रामस्थांची विचारपूस करत त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
बदलापूरची उल्हास नदी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. आज दिवसभरात उल्हास नदीने 18.80 मीटरची पाणीपातळी गाठली आहे. सध्या उल्हास नदीची पाणी पातळी 18.20 मीटरवर आहे. रस्त्यावरचं पाणी ओसरल्यामुळे बदलापूर शहराकडून ग्रामीण भागाकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. पाऊस पूर्णपणे थांबल्यामुळे नदीची पाणीपातळी ओसरण्यास सुरुवात झालीये.
बारवी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेले दोन जण वाहून गेले आहेत. गणेश केणे (35) आणि ज्ञानेश्वर गोंधळी (35) अशी वाहून गेलेल्यांची नावं आहेत. टाकीची वाडी इथून मासेमारी करताना दोघे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्याकडून शोध कार्य सुरू आहे.