पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यूची चौकशी आता SIT मार्फत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

| Updated on: Feb 11, 2023 | 1:51 PM

लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यूची चौकशी आता SIT मार्फत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. वारिसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. तसेच यामागील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्या, अशी मागणीही जोर धरतेय. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत SIT गठीत करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला सोमवारी रात्री भरधाव गाडीने धडक दिले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात बातमी दिल्याने वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे. बुधवारी पोलिसांनी गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

संजय राऊत यांचे गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी एक पत्र लिहिले आहे. नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. यासंदर्भात शशिकांत वारिसे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या भागातील काही राजकारण्यांच्या डोळ्यात ते खुपत होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या २४ तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात, रिफायनरीला कोण आववं येतंय ते पाहू आणि नंतर दुसऱ्याच दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो, याचा काय संबंध लावायचा, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

नारायण राणेंचं नाव?

तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं नाव घेतलं आहे. ज्या गुंडांनी शशिकांत वारिसे याची हत्या घडवून आणली, त्यांना नारायण राणे यांची चिथावणी होती का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.