भारताने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे. भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय सुविधा मिळत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना त्याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन नागपूरवरून सिकंदराबादकडे रवाना झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
पुणे शहरात वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार झाला. त्याबाबत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही पाहिले आहात, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तात्काळ शोधून काढतो. ठोकून काढतो म्हणजेच जेलमध्ये टाकतो. नेते आणि गुंड यांच्या भेटीवर ते म्हणाले, अनेक वेळा नेत्यांना अनेक लोक भेटत असतात. भेटण्यास येणारे कोण असतात हे नेत्यांना बऱ्याच वेळा माहीत नसते. आता येथेही इतके लोक आहेत. कोण मला भेटेल, कोण मला हार घालेल हे माहिती नसते. परंतु माहिती असताना असे घडू नये.
धनगर आरक्षणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर आरक्षणाबाबत रविवारी बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहेत. त्या मागे काही राजकारण आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ते तुम्ही त्यांना विचारले पाहिजे. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपसंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, महायुतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. या विषयावर आम्ही पुढे चाललो आहोत. लवकरच जागा वाटपाचे सर्व काम पूर्ण करू.