‘राज्यातील शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली पाहिजे’, कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची मागणी

| Updated on: Sep 18, 2024 | 9:15 PM

राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल आता सरकारकडून घेतली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

राज्यातील शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली पाहिजे, कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची मागणी
कीर्तनकार इंदोरीकर
Follow us on

मोबाईल हा आपल्या आयुष्यातील जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईलशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. प्रत्येक व्यक्ती मोबाईलशिवाय घराबाहेर पडणार नाही. कुठेही बाहेर जायचं असेल तर आपण आधी मोबाईल घेतला ना? याची शहानिशा करतो. अर्थात मोबाईल हा तसा आवश्यक असला तरी त्याचा अतिवापर हा घातक ठरु शकतो. विशेष म्हणजे लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्याकडून केला जाणारा मोबाईलचा अतिवापर हा त्यांच्यासाठी हानीकारक ठरु शकतो. याशिवाय अनेक शाळांमध्ये शाळा सुरु असण्याच्या कालावधीत शिक्षकांकडूनही मोबाईल वापरला जातो. या दोन्ही गोष्टींवर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी शाळेत थेट मोबाईल बंदी करावी, अशी मागणी आपल्या कीर्तनातून केली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान जसं वाढत आहे, तसं जग जवळ येत आहे, असं मानलं जात आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग तर प्रचंड जवळ आलं आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. पण तरीदेखील मोबाईल आणि इंटरनेटचा वापर हा गरजेपुरताच करायला हवा. कारण गरजेपेक्षा त्याचा जास्त वापर किंवा अतिवापर केल्यास त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापरण्याचे परिणाम वाढताना दिसत आहेत. अर्थात या मोबाईलचा वापर शैक्षणिक कारणांसाठी होत असेल तर चांगलंच आहे. पण मुलांकडून अनेकदा केवळ गेम खेळण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे मोबाईलच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी काही बंधनं असणं आवश्यक असल्याचं म्हटलं जातं. याचबाबत प्रसिद्ध कीर्तनकार यांनी आपल्या कीर्तनात शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी केली आहे.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले?

राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली आहे. शाळेत शिक्षकांच्या मोबाईलच्या वापरामुळे शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचा दावा इंदुरीकर महाराज यांनी केला आहे. त्यामुळे रोज शाळेच्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेत शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. अकोल्यात कीर्तनात त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे.