नवाब मलिक मुस्लिमांचे मसिहा आहेत काय?; संजय शिरसाट यांचा सवाल

| Updated on: Dec 08, 2023 | 2:57 PM

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने नवाब मलिक यांना सोबत घेण्यास विरोध केला आहे. शिंदे गटानेही भाजपच्या सुरात सूर मिसळल्याने महायुतीत अजितदादा गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप आहे. त्यांना सोबत घेतल्यावर समाजाता चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक मुस्लिमांचे मसिहा आहेत काय?; संजय शिरसाट यांचा सवाल
sanjay shirsath
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 8 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुद्दयावरून नागपूरची राजकीय हवा चांगलीच तापली आहे. मलिक यांना सोबत घेण्यास भाजपने विरोध केल्यानंतर शिंदे गटानेही भाजपच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे मलिक यांची चांगलीच कोंडी झाली आहे. तर, अजितदादा गटाचीही मलिक यांच्या मुद्द्यावरून चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या वादात उडी घेतली आहे. काँग्रेस नवाब मलिक यांना मुस्लिमांचा मसिहा बनवण्याचा प्रयत्न करत आहे काय? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.

नवाब मलिक यांना मुस्लिमांचा मसिहा बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून का सुरू आहे? हा माझा प्रश्न आहे. नवाब मलिक मुस्लिमांचे मसिहा आहेत का? इतर मुद्दे राहिले बाजूला, केवळ नवाब मालिकांचा मुद्दाच चर्चेमध्ये येऊ लागलेला आहे. तोच इतका महत्त्वाचा वाटू लागलेला आहे. आमचा त्यांना सुरुवातीपासून विरोध होता, आहे आणि पुढे राहील. आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही ही आमची भूमिका आहे. देशद्रोहाचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत बसणं शक्यच नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

आरोपात साम्य, पण…

प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांमध्ये आणि नवाब मलिकांच्या आरोपांमध्ये बरंच साम्य आहे. प्रफुल्ल पटेल यांना अटक झालेली नाहीये. ज्यावेळी त्यांना होईल, त्यावेळी त्यांच्याबाबतही आम्ही हीच भूमिका घेऊ. पण नवाब मलिक यांच्यावरचे आरोप गंभीर असताना त्यांच्याबाबत असे निर्णय आम्हाला मान्य नाही, असंही ते म्हणाले.

ते होऊ देणार नाही

यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावरही टीका केली. यशोमती ठाकूर यांना जरा जास्तच कळू लागलेलं आहे. मला असं वाटतंय की, इंग्रजांची नीती त्या अंगीकारत आहेत आणि आम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की, ज्या पद्धतीने इंग्रज वागत होते, त्याच पद्धतीने आता काँग्रेस सुद्धा वागू लागली आहे. धर्माचं ध्रुवीकरण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. नवाब मलिकांच्या माध्यमातून ते होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

अजितदादा भूमिका स्पष्ट करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून नवाब मलीक यांच्याबाबत जी भूमिका घेतली, तिच भुमिका शिवसेनेची आहे. नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत न घेणे हीच शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना कट्टर हिॅदूत्त्ववादी आहे. फडणवीसांच्या भूमिकेच्या आम्हाला आनंद आहे. अजित पवार यांनी मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.