‘जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा अशी मंत्र्यांची स्थिती’, नेमकं कुणी केली टीका?

| Updated on: Jul 10, 2024 | 7:12 PM

"मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते, शिंगाडा मोर्चा काढणार. आता सोंग करुन बसले आहेत. आता त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या कळत नाही. तर राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन स्वत:ला समजून घेतात, मात्र त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही", अशी टीका ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी केली.

जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा अशी मंत्र्यांची स्थिती, नेमकं कुणी केली टीका?
माजी खासदार उन्मेष पाटील यांची जळगावच्या तीनही मंत्र्यांवर टीका
Follow us on

“जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा अशी मंत्र्यांची स्थिती आहे, लबाड मंत्र्यांची फौज आहे. जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक आहेत. पण लाजा वाटत नाही, का बोंब पाडत नाहीत? का दूध उत्पादकांना भाव देत नाहीत? मंत्री गिरीश महाजन यांची मातीशी नाळ राहिलेली नाही. पैसा आणि मस्ती यामुळे त्यांनी शेतकऱ्यांशी नाळी तोडलेली आहे. मंत्री मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील त्यांची ना मदत ना पुनर्वसन, त्यांचेच पुर्नवसन करण्याची वेळ झाली आहे”, अशा खोचक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर उन्मेश पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या तीनही मंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली.

“मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते, शिंगाडा मोर्चा काढणार. आता सोंग करुन बसले आहेत. आता त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या कळत नाही. तर राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन स्वत:ला समजून घेतात, मात्र त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही. ज्वारीचे खरेदी केंद्र नाही. तिसरे मंत्री मदत आणि पुनर्वसन अनिल पाटील त्यांची ना मदत ना पुनर्वसन, त्यांचेच पुनर्वसन करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला कुणीही वाली राहिलेला नाही, यांच्यात एकाचीही उत्तर देण्याची हिंमत नाही”, असा घणाघात उन्मेष पाटील यांनी केला.

‘भाजपचा चेहरा आता उघड झाला’, उन्मेष पाटील यांची टीका

“मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे. आदिवासी आणि कोळी समाजामध्ये भांडण लावायचे. तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची. मात्र अंमलबजावणी करायची नाही. केवळ सामाजिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजता येईल का? हा या भाजपचा चेहरा आता उघड झाला आहे”, अशी टीका उन्मेष पाटील यांनी केली.

‘महाविकास आघाडी लढा देईल’

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असोत किंवा मंत्री गिरीश महाजन, त्यांचा चेहरा उघडा पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडी लढा देईल. लोकांना न्याय देवू शकत नसाल तर खुर्च्या खाली करा”, अशा शब्दांत उन्मेष पाटील बरसले. “जिल्हा दूध संघाचे चेहरमन म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान टाकण्याची बोंब पाडा. आम्ही ज्या प्रश्नांची उत्तर मागतो आहे, त्याला उत्तरे द्या आणि ती बोंब पाडा”, असंदेखील उन्मेष पाटील यावेळी म्हणाले.