किती वाईट अवस्था! ‘या’ लाडक्या बहिणीच्या डोळ्यांमधील अश्रूची दखल सरकार घेईल का?

| Updated on: Oct 10, 2024 | 8:31 PM

जळगावच्या धरणगाव येथील आरबीएल बँकेत महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनांचे पैसे जमा होऊनही महिलांना पैसे मिळत नाहीयत. त्यामुळे महिला दररोज बँकेच्या चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे महिला या वेगवेगळ्या गावांमधून खूप लांबून बँक खात्यातील पैसे मिळवण्यासाठी येत आहेत.

किती वाईट अवस्था! या लाडक्या बहिणीच्या डोळ्यांमधील अश्रूची दखल सरकार घेईल का?
'या' लाडक्या बहिणीच्या डोळ्यांमधील अश्रूची दखल सरकार घेईल का?
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : गाव-खेड्यात सध्याच्या घडीला पैसे बघायला मिळत नाहीत. कारण शेतकऱ्याने सर्व पैसे हे शेतात टाकलेले असतात. शेतात पिकं उभी राहावीत यासाठी शेतकरी आपल्याकडील सर्व पैसे खर्च करतो. यासाठी शेतकरी वेळप्रसंगी कर्जदेखील काढतो. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांचा एक-एक रुपयांसाठी संघर्ष असतो. त्यांच्यासाठी त्या प्रत्येक रुपयाला महत्त्व आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं हे वास्तव आहे. पण शेतकऱ्यांना बँक खात्यांमधून पैसे काढण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो. जळगावच्या धरणगाव तालुक्यात असाच एक विचित्र प्रकार बघायला मिळत आहे. जळगावच्या धरणगाव येथील आरबीएल बँकेत महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनांचे पैसे जमा होऊनही महिलांना पैसे मिळत नाहीयत. त्यामुळे महिला दररोज बँकेच्या चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे महिला या वेगवेगळ्या गावांमधून खूप लांबून बँक खात्यातील पैसे मिळवण्यासाठी येत आहेत. पण बँकेकडून त्यांना तांत्रिक कारण सांगत पैसे देण्यास मज्जाव करण्यात येत असल्याने एका महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेच्या डोळ्यांमधील अश्रू सुन्न करणारे आहेत. यावेळी संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं.

धरणगावमध्ये नेमकं काय घडलं?

जळगावच्या धरणगावमध्ये लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन केलं. धरणगाव येथील बँकेत तांत्रिक अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. धरणगाव येथील आरबीएल बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने लाडक्या बहिणींची गैरसोय होत आहे. पात्र महिलांना वेळेवर पैसे देण्यास अडचण येत आहेत. परिणामी पैशांसाठी वेगवेगळ्या गावांवरून महिलांना बँकेच्या चकरा मारण्याची वेळ येत असून मात्र पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.

बँकेच्या तांत्रिक अडचणी तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलांनी धरणगावमध्ये तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ऐन सणासुदीच्या काळात पैसे मिळत नसल्याचे सांगताना आंदोलन करणाऱ्या एका महिलेला अश्रू अनावर झाले. वारंवार चकरा मारूनही वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली. तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.

ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

पोलीस अधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या आश्वासनानंतर महिलांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं. महिलांना वेळेवर पैसे मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी यावेळी दिला. “राज्य सरकारने दसरा आणि दिवाळी सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैस देण्याची घोषणा केली आहे. अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आल्याचा मेसेज मोबाईलवर मिळाला आहे. पण धरणगावच्या आरबीएल बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने लांबून वेगवेगळ्या गावांवरुन आलेल्या महिलांना त्यांचे हक्काच्या पैशांपासून वंचित राहावं लागत आहे. या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण समजत असतील तर कर्मचाऱ्यांनी परक्या महिला का समजाव्यात? बाहेरगावाहून महिलेला चार-चार दिवस यावं लागत आहे. यामुळे एका महिलेला यावेळी अश्रू अनावर झाले. महिलांना असाच त्रास राहिला तर आम्ही उद्या तीव्र आंदोलन करु”, असा इशारा गुलाबराव वाघ यांनी दिला आहे. आता या प्रकरणाची दखल सरकारकडून घेतली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.