ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा; पंकजा मुंडे यांचं थेट सरकारलाच आव्हान

| Updated on: Jun 17, 2024 | 8:33 PM

"मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे", अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा; पंकजा मुंडे यांचं थेट सरकारलाच आव्हान
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us on

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करावी. पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी या नेत्यांची आहे. या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या दोन्ही नेत्यांच्या उपोषणस्थळी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखल झाल्या. त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील तिथे उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला थेट आव्हानच दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा, असं आव्हान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

“मी दोन दिवस झाले. मी अतिशय विचित्र आणि दु:खी भावनांना सामोरे गेली आहे. मला भेटल्या-भेटल्या आमचे लक्ष्मण भाऊ रडायला लागले. मी त्यांना विचारलं की, लक्ष्मण भाऊ का रडत आहात? तर त्यांनी सांगितलं, ताई तुमचा पराभव झाल्यामुळे चार लोकांनी स्वत:चा जीव संपवला. हे ऐकून मला खूप रडू येतंय. मी परिस्थिती हाताळत असल्यामुळे विचार केला की, याला कुठलंही राजकीय वळण यायला नको. मी फक्त लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जावून त्यांचं म्हणणं काय आहे ते सरकारपर्यंत मांडणार असा त्यांना शब्द देते”, असं आश्वासन पंकजा यांनी उपोषणकर्त्यांना दिलं.

पंकजा मुंडे यांची सरकारकडे मागणी काय?

“माझी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे. आंदोलन देशात कुणीही करु शकतो. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तृव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

“डोंगर, कपाऱ्यात जावून जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे. या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजवून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं.ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याच प्रमाणे यांचं उपोषण सोडवलं जावं”, अशीदेखील मागणी पंकजा मुंडे यांनी केली.